टवटवीत सूर्यफुलाच्या दिशेनं आशेच्या कोवळय़ा किरणांसह वाटचाल करणारे आसामी कवी, पद्मश्री नीलमणी फुकन आणि समाजातील अंधश्रद्धेवर प्रहार करताना निश्चित अशी भूमिका घेऊन उभे राहणारे कोकणी साहित्यिक दामोदर मावजो यांना सर्वोच्च मानाचा समजला जाणारा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला आहे. कोविडमुळे निर्माण झालेल्या अभूतपूर्व परिस्थितीमुळे स्थगित असलेले हे पुरस्कार नुकतेच घोषित झाले. मुंबईतील पोतदार महाविद्यालयात शिक्षण घेतलेले दामोदर मावजो सध्या गोव्यात वास्तव्यास आहेत. नीलमणी फुकन यांचा जन्म आसाममधील जोरहाटजवळच्या डेरगाव या छोटय़ा खेडय़ात झाला. त्यांच्या कवितेला अस्सल आसामी मातीचा गंध त्यामुळेच लाभला आहे. माणूस हा फुकन यांच्या कवितेचा केंद्रबिंदू आहे. माणुसकीचे दर्शन घडवणाऱया कविता त्यांच्या अनेक संग्रहात आहेत. माणुसकी म्हणजे केवळ चांगुलपणा, आत्मीयता, प्रेम नव्हे. माणसाची लबाडी, त्याच्यातील खोटेपणा, क्रौर्य, शत्रूत्व बाळगण्याची वृत्ती या गोष्टीही ‘माणूसकी’मध्येच येतात. त्या सगळय़ा भावभावनांचा कल्लोळ फुकन यांच्या कवितेतून प्रतीत होतो. त्यामुळेच त्यांची माणसाची आंतरिक वृत्ती दाखवणारी कविता वैश्विकता मुखर करते. जगभरात माणूस इथून-तिथून सारखाच असला तरी प्रत्येकाचे पर्यावरण, संस्कृती आणि संस्कार निराळे असतात. माणसाचे जगणे हीच एक कविता आहे, असे मानणाऱया फुकन यांनी माणसाच्या अव्यक्त आनंद आणि दुःखाला उद्गार दिला. म्हणूनच त्यांची कविता व्यक्ती ते समष्टी अशी वृद्धिंगत झाली. त्यांची कविता कलात्मक कारागिरी दर्शवत असली तरी वास्तवाची जाण आणि जीवनाची समज दाखवणारी आहे. 1950 नंतर प्रामुख्याने कविता लिहायला लागलेले फुकन आसामी भाषा आणि अस्मितेचे प्रतीक मानले जातात. आधुनिक प्रतिमांचा वापर आसामी कवितेत त्यांनी सुरू केला. प्रेंच प्रतीकवादातून प्रेरणा मिळाल्याचे ते मान्य करतात. जपानी आणि चीनी भाषेबरोबरच युरोपीय भाषांचेही ते जाणकार होते. स्पॅनिश कवी प्रेडरिको गार्सिया लॉर्काच्या कवितांचा अनुवाद त्यांनी केला. मराठी वाचकांना लॉर्का ठाऊक आहे तो त्याच्या ‘यर्मा’ या नाटकामुळे. आरती हवालदारांनी त्याचा ‘चांगुणा’ या नावाने अतिशय उत्तम अनुवाद केला असून त्या नाटय़प्रयोगात रोहिणी हट्टंगडी यांची चांगुणेची भूमिका हृदयस्पर्शी होत असे. लॉर्काबरोबरच फुकन यांनी 17 व्या शतकातील जपानी कविता, जपानी हायकू, चीनी कवितांचा अनुवाद केला. या दोन्ही संस्कृतीची त्यांची जाण वाखाणण्याजोगी आहे. गुवाहाटीत अध्ययनानंतर अध्यापन करणाऱया फुकन यांचे सृजन ब्रह्मपुत्रेच्या खोऱयातील जीवनसंगीताने बहरले. लोककला आणि संस्कृतीशी ते एकरूप झाले आहेत, त्यामुळेच दृश्यकला, शिल्पकलेवरील त्यांची पुस्तकेही गाजली. बी. के. भट्टाचार्य आणि इंदिरा गोस्वामी यांच्यानंतर ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे आसामी भाषेतील ते तिसरे कवी-साहित्यिक आहेत. सगळय़ा भारतीय भाषा आणि बोली एका छताखाली आल्यास भारतीयांचे एकजिनसीकरण होईल, आपलेपणा वाढीस लागेल, असे त्यांना वाटते. माणूस हाच घटक केंद्रस्थानी ठेवून कथा-कादंबऱया लिहिणारे दामोदर मावजो हे प्रतिभावान लेखक आहेत. ‘कार्मेलिन’सारख्या कादंबरीतून त्यांनी ख्रिश्चन स्त्रियांची वेदना वेगळय़ा पद्धतीने मांडली आहे. कॅथॉलिक ख्रिश्चनाच्या जीवनसंस्कृतीचे अचूक आणि बारीक निरीक्षण त्यांनी नोंदवले आहे. मावजो यांना त्यासाठी साहित्य अकादमी पुरस्कारही मिळाला आहे. या कादंबरीचे मराठीसह अनेक भारतीय भाषांमध्ये अनुवाद झाले. मावजो यांचे बालपण माजोर्डय़ात गेले. प्राथमिक शिक्षण मराठीत आणि नंतर पोर्तुगीज-इंग्रजीचाही मोठा व्यासंग त्यांनी केला. मात्र, ‘सूड’, ‘कार्मेलिन’, ‘सुनामी सायमन’, ‘जीव दिवं काय च्या मारू’ यासारख्या कादंबऱया आणि इतर कथासंग्रह त्यांनी कोकणीतच लिहिले. ‘गांथन’ हा त्यांचा पहिला तर ‘तिश्टावणी’ हा शेवटचा कथासंग्रह. तसे पाहिले तर गोव्यातील कोकणीचा आविष्कार कन्नड आणि रोमन लिपीतूनही होतो. मावजो यांनी कोकणीसाठी देवनागरी लिपी निवडली. मराठीचेही ते उत्तम जाणकार आहेतच. गोव्याची राज्यभाषा म्हणून कोकणीलाच मान्यता मिळाली आहे. मावजो यांनी साठ वर्षांच्या लेखन कारकिर्दीत विपूल लेखन केले आहे. ‘निळें निळें सवणें’ या त्यांच्या कोकणी नाटकाला उत्कृष्ट नाटय़लेखनाचा पुरस्कारही मिळाला आहे. ‘आलीशा’ या चित्रपटाची पटकथा त्यांचीच. गोवा फिल्म फेस्टिव्हलमध्ये तिला उत्कृष्ट पटकथेचा पुरस्कारही प्राप्त झाला आहे. दामोदर मावजो हे भूमिका असलेले लेखक-साहित्यिक आहेत. सत्याची बाजू घेऊन आपण निर्भिडपणे उभे राहिले पाहिजे, बोलले पाहिजे असे त्यांचे मत आहे. त्यासाठी वाट्टेल ती किंमत मोजायची तयारी त्यांनी ठेवली. अंधश्रद्धेवर प्रहार, परखडपणा आणि स्पष्टवक्तेपणामुळे त्यांना संघर्षही करावा लागला आहे, मात्र समाजकारण आणि राजकारणापासून लेखकांनी दूर पळता कामा नये, असे ते निक्षून सांगतात. पुरस्कार मिळावा म्हणून आपण कधीही लेखन केले नाही, असे ते सांगतात तेव्हाच त्यांच्या लेखक म्हणून असलेल्या ताठ कण्याचा प्रत्यय येतो. त्यांच्या लेखनातून अर्थातच त्याचे प्रतिबिंब पडलेले आहे. पत्रकार गौरी लंकेश, एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्येनंतर त्यांनी कणखर भूमिका घेतली. झोटिंगशाही, सत्तेच्या उन्मादाला त्यांनी नेहमीच आव्हान दिले. परिणामांची पर्वा न करता आपल्या भूमिकेशी इमान राखणारे मावजो हे नव्या पिढीचे आदर्श ठरावेत. ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित होणारे ते कोकणी भाषेतील दुसरे साहित्यिक आहेत. यापूर्वी रवींद्र केळेकर यांचा ज्ञानपीठाने गौरव झाला आहे. ‘एनआरसी’ आणि ‘सीएए’मुळे आसामी भाषेवर अतिक्रमण होण्याची शक्मयता आहे, असे फुकन यांना वाटते. त्यामुळेच त्याला आपला विरोध आहे, असे त्यांनी म्हटले आहे. सर्जनशील लेखन करतानाच आपल्या विचारधारेपासून तसुभरही न ढळण्याची वृत्ती हे फुकन आणि मावजो यांच्यातील साम्य आहे. या दोघांचेही लेखन काळाच्या कसोटीवर दीर्घकाळ टिकून राहिल यात शंका नाही, कारण तो मानवतेचा अंतःस्वर आहे!
Previous Articleइंग्लंडचा पहिला डाव 147 धावांमध्येच खुर्दा
Next Article सज्जनांचे भूषण म्हणजे त्यांचे चारित्र्य होय
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.