कोरोना विषाणूचा संसर्ग व लॉकडाऊनमुळे दिनक्रम बदलल्याने डॉक्टर मंडळीचा सल्ला
प्रसाद नागवेकर/ मडगाव
कोरोनामुळे देशभरात आठवडाभरापासून लॉकडाऊन आहे. साहजिक मनुष्य चार भितींआड बंदिस्त झाला आहे. त्यामुळे साहजिकच माणसाच्या मानसिक स्वास्थ्यावर परिणाम होणार असल्याने योग, प्राणायाम, ध्यानधारणा, सकस आहार व व्यायामावर भर देण्याची मात्रा आता डॉक्टर मंडळी देऊ लागली आहे.
कोरोनामुळे सर्व व्यवहार बंद होऊन दिनक्रमच बदलला आहे. त्यामुळे निराशा मनात घरू करू शकते. त्यासाठी मानसिक स्वास्थ्याची काळजी घेण्याची गरज असल्याचे मत मडगावचे नामवंत फिजिशियन व श्री श्री रविशंकर यांच्या सुदर्शन क्रिया या श्वसन प्रक्रियेवर नियंत्रण ठेवण्याच्या क्रियेचे शिक्षक असलेले डॉ. व्यंकटेश हेगडे यांनी व्यक्त केले.
सकारात्मक विचार मनात आणावेत
कोरोनाविरुद्ध आम्हा सर्वांना लढा द्यायचा आहे. त्यासाठी आपण सक्षम आहे, असे सकारात्मक विचार मनात आणले पाहिजेत. मनात भीती बाळगणे योग्य नाही. त्यातून निराशा, मन खचण्याचे प्रकार होतील. चांगली झोप, सकस व सात्विक आहार आवश्यक आहे, असे डॉ. हेगडे यांनी सांगितले. चांगली झोप घेणे तसेच संगीत ऐकणे व अंतरीच्या देवाला स्मरणे हेही मनस्वास्थ्यासाठी आवश्यक असल्याचे डॉ. हेगडे यांनी सांगितले.
तेलकट पदार्थ वगळून साधा आहार घ्यावा
सध्या जिन्नस उपलब्ध नसल्याने आहाराबाबत काही अडचणी असू शकतात. तसे असल्यास तेलकट पदार्थ वगळून साधा आहार घ्यावा तसेच दिवसाला दोन वेळा योग, प्राणायाम, ध्यानधारणा करावी. त्यातून आवश्यक प्रतिकारशक्ती व सकारात्मक उर्जा मिळणे शक्य असल्याचे त्यांनी नजरेस आणून दिले.
व्यायाम करा, सकस आहार घ्या
याखेरीज धुम्रपान टाळण्याचे आवाहन आरोग्य संघटनेच्या डॉक्टरांनी केले आहे. कोणी धुम्रपान करत असल्यास व त्याला कोरोनाचा संसर्ग झाल्यास गंभीर परिणाम होण्याची जास्त शक्यता असल्याचे सांगण्यात आले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनामुळे जीवनचक्रात बदल झाल्याने मानसिक स्वास्थ्य सक्षम राखण्याकरिता व्यायाम, सकस जीवनसत्वांची चांगली मात्रा असलेला आहार घेण्याचा सल्ला दिला आहे. दररोज घरातच अर्धा तास व्यायाम करावा तसेच आपल्या जवळच्या जागेत एखादा फेरफटका मारून मनाला ताजेतवाने ठेवण्याचा सल्ला या संघटनेचे डॉक्टर देताना आढळतात.
मद्यपान तसेच साखरेचे प्रमाण जादा असलेले पदर्थ टाळा, असा सल्ला डब्ल्यूएचओच्या डॉक्टरांनी अधिकृत संकेतस्थळावर दिला आहे. प्रतिकारशक्ती वाढविण्यावर भर देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कारण सद्यस्थितीत कोव्हिड-19 वर कोणतीही लस व औषधे उपलब्ध नसल्याने सक्षम प्रतिकारशक्ती असलेलेच कोरोनावर मात करू शकत असल्याचे आढळून आले आहे.