सर्वच भातपिके कुजून लाखो रुपयांचे नुकसान : शासनाने नदीपात्राचा सर्व्हे न केल्याने शेतकऱयांना मोठा आर्थिक भुर्दंड
वार्ताहर/ कंग्राळी बुद्रुक
गेल्या दहा-बारा दिवसांपूर्वी तालुक्यामध्ये झालेल्या संततधार पावसामुळे नदी, नाले, तलाव तुडुंब भरून वाहत होते. बहुतांश भातशेतीही पाण्याखाली होती. राकसकोप येथून येणाऱया मार्कंडेय नदीला दोनवेळा पूर येऊन नदीकाठावरील भातरोप लागवड केलेले व पेरणी केलेले भात पीक कुजून शेतकऱयांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. मागील वर्षाची पुनरावृत्ती यावर्षीही वरुणराजाने दाखविल्यामुळे शेतकरी वर्ग नुकसानीच्या छायेखाली सापडल्यामुळे नदीकाठ परिसरातील शेती कशी करायची ही चिंता लागून राहिली आहे.
शासनाने मार्कंडेय नदीकाठ परिसरातील भातपीक कुजलेल्या शेतीचा सर्व्हे करून शेतकऱयांना जास्तीतजास्त नुकसान भरपाई मिळवून देण्याची मागणी करण्यात येत आहे.
गेले पाच-सहा दिवस पावसापासून पावसाने थोडी उसंत घेतल्यामुळे नदीला आलेला पूर ओसरला आहे. पण पुराने नुकसान झालेल्या शेतीची स्थिती पूर ओसरल्यानंतर दिसून आली आहे.
बेळगाव तालुक्याच्या पश्चिम भागाला वरदान ठरेलेली ही मार्कंडेय नदी पावसाळय़ामध्ये नदीकाठ शिवारातील शेतकरी वर्गाला कर्दनकाळ ठरत असल्याच्या प्रतिक्रिया शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहेत. मार्कंडेय नदी राकसकोप, यळेबैल, सोनोली, बेळगुंदी, कल्लेहोळ, तुरमुरी, उचगाव, हिंडलगा, आंबेवाडी, मण्णूर, गोजगा, अलतगा, कंग्राळी खुर्द, कंग्राळी बुद्रुक, जाफरवाडी, कडोली, गौंडवाड, काकती, होनगा शिवारातून जाऊन पुढे घटप्रभा नदीला मिळते. परंतु संततधार पावसामुळे नदीला पूर आल्यास पश्चिम भागाला नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.
मागील वर्षाची पुनरावृत्ती
मागील वर्षी तर मार्कंडेय नदीला महापूर आला होता. काठ परिसरातील प्रत्येक शेतकऱयाचे 100 टक्के नुकसान झाले होते. संपूर्ण भात कुजल्यामुळे जनावरांच्या चाऱयाचा प्रश्न उद्भवला होता. हिरवा चारा, उन्हाळी पिंजर व भात उत्पादन सर्वच वाया गेल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला होता. तीच पुनरावृत्ती या पंधरा दिवसांपूर्वी संततधार पडलेल्या पावसाने झाली आहे.
कोरोनानंतर आता हे दुसरे संकट
कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी सरकारने सर्व व्यवहार लॉकडाऊन केल्यामुळे उन्हाळी भाजीपाल्याच्या पिकाच्या नुकसानीचा मोठा फटका शेतकऱयांना बसला आहे. अजुनही कोरोनाचा संसर्ग कमी होत नसल्याचे दिसून येत असताना संततधार पावसामुळे मार्कंडेय नदीकाठ परिसरातील भातशेती पुराच्या पाण्याखाली जाऊन रोप लागवड व पेरणी केलेले शेत पंधरा दिवसात भकास झाल्यामुळे शेतकऱयांना हे दुसरे संकट ओढवले आहे.
शेतातील गाळ वाहून गेल्याने मोठे नुकसान
अति पावसामुळे बांध फुटून मातीचा गाळ शिवारात पसरल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. गाळ गेल्याने शेतवडीतील कसही दुसरीकडे गेल्याने जमीन बिनकसदार बनली आहे. त्या जमिनीला कसदारपणा आणण्यासाठी शेणखताचा मोठय़ा प्रमाणात डोस देण्याची गरज निर्माण झाली आहे. तसेच फुटलेले बांध दुरुस्त करण्यासाठीही मोठय़ा प्रमाणात खर्च करावा लागणार आहे. एकूनच याचा सर्व भुर्दंड शेतकऱयालाचा सोसावा लागणार आहे.
चौकट
मार्कंडेय नदी बचाव योजनेखालील 20 कोटी पाण्यात
गेल्या दहा वर्षांपूर्वी शासनाने मार्कंडेय नदी बचाव योजनेखाली 20 कोटींचा निधी खर्च केला. परंतु शासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे व रोजगार योजना काम देण्याचा दिलासा दाखविल्यामुळे 20 कोटी पाण्यामध्ये गेल्याच्या प्रतिक्रिया ऐकावयास मिळत आहे.
नदीचे पात्र सर्व्हे करून खोदाई करणे जरुरी
मार्कंडेय नदीच्या पात्रामध्ये अतिक्रमण झाल्यामुळे काही ठिकाणी नदीच्या पात्राची रुंदी 10 ते 15 फुटांवर आली आहे. काही ठिकाणी नदीला ओढय़ाचे स्वरुप आले आहे. मार्कंडेय नदी बचाव योजनेखाली नदी पात्राची खोदाई करताना सरकार दप्तरी असलेल्या नोंदीप्रमाणे त्यावेळेस नदीची खोदाई उत्कृष्ट झाली असती तर शेतकऱयांना फायद्याचे ठरले असते. पण तसे झाले नसल्याने शेतकऱयांच्या दृष्टीने नुकसानीचेच झाले आहे. यापुढे तरी शासनाने याची दखल घेऊन नदीचे काम व्यवस्थित करावे अशी मागणी होत आहे.