प्रतिनिधी/ पणजी :
पणजीतील विविध वस्तू खरेदीसाठी प्रसिद्ध असलेले आणि सतत ग्राहकांनी गजबजलेल्या पणजी मुख्य मार्केटमध्ये सध्या ग्राहकांचा ओघ कमी झाला आहे. यापूर्वी लॉकडाऊनमुळे आणि सध्या राज्यात आणि पणजीत वाढत्या कोरोना रूग्णांमुळे मोजकेच ग्राहक मार्केट संकुलात दिसून येतात. या परिस्थितीमुळे मार्केट संकुलातील व्यापाऱयांवर नुकसानीचे सावट पसरले आहे.
लॉकडाऊनपूर्वी मार्केट संकुलात भाज्या, घरगुती वस्तू तसेच विविध प्रकारच्या स्थानिक आणि विदेशी भाज्या, फळे घेण्यासाठी ग्राहक विविध भागातून यायचे. पर्यटकांनाही मार्केट संकुल एक वेगळेच आकर्षण वाटायचे. परंतु आता कोरोनामुळे आणि बाजारात कोरोना रूग्ण मिळाल्याच्या बातमीमुळे ग्राहक फिरकत नाहीत. काही व्यापाऱयांनी तर व्यापार होत नसल्यामुळे आपली दुकाने बंद ठेवली आहेत. भाज्या, फळे खरेदी करण्यासाठीही ग्राहकांची संख्या कमी प्रमाणात दिसून येते.
त्यातच ऐन श्रावणात भाज्यांचेही दर वाढले असल्यामुळे भाजी, फळे खरेदी करण्यासाठीही ग्राहक कमी येत आहेत. बहुतांश भाजीविक्रेत्यांनी तर आपले बस्तान मधल्या लॉकडाऊनमध्ये बांधले. श्रावण महिन्यात विविध सणांसाठी फुले, फळे यांचा व्यवसाय मोठया प्रमाणात होत असे. परंतु यंदा या व्यवसायांवर गडांतर आले आहे. त्यातच मनपाने मार्केट संकुलाचे दोनच मुख्य दरवाजे उघडले असून इतर दरवाजे बंद केले आहेत. त्यामुळे काही व्यापाऱयांकडून दरवाजे बंद केल्यावर नाराजी व्यक्त होत आहे आणि काही दरवाजे लवकरात लवकर उघडावेत अशी मागणीही होत आहे.
मार्केट संकुलात जास्ततः भाजी, फळे ही कर्नाटक, दिल्ली आदी राज्यातून गोव्यात येते. त्यासाठी व्यापाऱयांना विशेष गाडीही करावी लागते. मग त्या गाडीचे भाडे तसेच इतर गोष्टींमुळे व्यापारी नुकसानीत आहेत.