प्रतिनिधी / पणजी
बुधवारी पणजी मार्केट संकुल व मासळी मार्केटला पणजी मनपा व पोलिसांकडून टाळेबंद करण्यात आले. या संपूर्ण बुधवारी संध्याकाळपासून शुकशुकाट दिसून आला. मार्केट संकुलच्या परिसरात जास्त वर्दळ असते. परंतु मार्केट संकुल व इतर आस्थापने बंद करण्यात आल्यामुळे संपूर्ण परिसर शांत होता. लोकांची व वाहनांची वर्दळ कमी होती. काहीजणांना मार्केट किती दिवस बंद आहे याची माहिती नसल्याने गुरूवारी सकाळी रोजच्याप्रमाणे ग्राहक मार्केट संकुलात आले. परंतु तेथील तैनात करण्यात आलेल्या पोलिसांनी मार्केट बंद ठेवण्यात आले असल्याचे सांगितले. अनेकजण बंद मार्केट पाहून माघारी परतत होते. मार्केट संकुल पूर्वसूचना न देता बंद करण्यात आल्यामुळे ग्राहकांना तसेच व्यापाऱयांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. भाजीपाला तसेच इतर जीवनावश्यक वस्तूची सोय कशी करावी हा प्रश्न ग्राहकांसमोर उपस्थित झाला आहे.
गुरूवारी सकाळी घाऊक व्यापारी माल घेऊन पणजी मार्केटमध्ये आले असता त्यांनाही माल परत घेऊन जाण्याची सूचना पोलिसांनी व मनपा अधिकाऱयांनी दिली. आंबे विकण्यासाठी आलेल्या घाऊक व्यापाऱयांनाही मनपाच्या कर्मचाऱयांनी परत घेऊन जाण्याची सूचना दिली. मनपातर्फे योग्यरित्या व्यवस्थापन केले जात नाही. विविध ठिकाणहून घाऊक व्यापारी आपला माल विकण्यासाठी पणजी मार्केट संकुलात येतात. परंतु व्यापाऱयांना सूचना देण्यात आली नसल्याने घाऊक व्यापारीही मनपाच्या व्यवस्थापनावर नाराजी व्यक्त करत आहेत. व्यापाऱयांना होणाऱया नुकसानीला मनपा जबाबदार आहे असा आरोप व्यापाऱयांतर्फे केला जात आहे. पणजी मनपाने मार्केट बंद करण्याची सूचना व्यापाऱयांना दिली नसल्याने मनपा व सरकारच्या व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
महापौर रोहित मोन्सेरात यांनी भाजीविक्रेते व फळविक्रेत्यांना आयनॉक्सच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला सामाजिक अंतर राखून व्यवसाय करण्यासाठी मुभा दिली होती. परंतु पोलिसांनी सदर ठिकाणी बसण्यासाठी नकार देत विक्रेत्यांना हटविले.