अपघातात दोन जण जखमी
वार्ताहर /केळघर
सावंतवाडी आगाराच्या मालवाहतूक एसटी बसचा भीषण अपघात केळघर घाटातील काळा कडा येथे बुधवारी रात्री होऊन या अपघातात दोन जण जखमी झाले आहेत.या अपघातात देवरुख आगाराचे चालक मयूर पावनिकर(वय 40),रामकिशन केंडे(वय 42) हे जखमी झाले आहेत. घटनास्थळी मेढा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अमोल माने, महाबळेश्वर चे आगार व्यवस्थापक नामदेव पतंगे ,स्थानक प्रमुख किरण धुमाळ, कार्यशाळा कर्मचारी महाबळेश्वर आगार ,मेढा आगार व्यवस्थापक सुजित घोरपडे यांनी तातडीने भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.हा अपघात झाल्यानंतर मुकवली माची येथील प्रकाश खुटेकर, विठ्ठल खुटेकर, सर्जेराव खुटेकर, बाळू खुटेकर, सुनील खुटेकर, रेंगडी येथील भरत कासुर्डे यांच्यासह ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन जखमींना दरीतून वर काढून मदत केल्याने तसेच केळघर प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी पोचल्याने जखमींना पुढील उपचारासाठी सातारा येथे खासगी रुग्णालयात वेळेत नेता आले.
मेढा पोलीस ठाण्यातून व घटनास्थळी मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी रात्री दहा ते साडेदहा वाजण्याच्या सुमारास सावंतवाडी आगाराची मालवाहतूक बस क्र. एम.एच.20बी. एल.0429 माणगाव हुन कलिंगडे भरून सांगली कडे चालली होती. केळघर घाटात ही बस रात्री दहा वाजण्याच्या सुमारास रेंगडी गावच्या हद्दीत काळा कडा येथे एका अवघड वळणावर आली असता चालकाला वळणाचा अंदाज न आल्याने व बसवरील नियंत्रण सुटल्याने ही मालवाहतूक बस काळा कडा येथील वळणावर अंदाजे 500 फूट खोल दरीत कोसळली. मालवाहतूक ट्रक माणगाव येथून सांगली करिता कलिंगड घेऊन जात असताना सुमारे दहाच्या च्या दरम्यान महाबळेश्वर आगाराततून बाहेर पडले. महाबळेश्वर मेढा मार्गावर केळघर जवळ काळा कडा येथे ट्रक आला असता चालकाचे ट्रक वरील नियंत्रण सुटल्याने माल ट्रक रस्त्याच्या कडेला झाडाला धडकून सरळ दरीत सुमारे 500 फूट कोसळला. माल ट्रक वर काम करणाया चालकांपैकी 1 चालकाने कसेतरी वर येऊन मार्गावरील इतर वाहने थांबून अपघाताची कल्पना दिली. स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने मदत केल्याने या चालकांचे प्राण वाचले असून यामुळे या चालकांना वेळेत उपचार मिळाले.
आज घटनास्थळी विभाग नियंत्रक सागर पळसुले, विभाग यंत्र अभियंता श्री. मोहिते यांनी भेट देऊन घटनेची सविस्तर माहिती घेतली. या अपघाताची नोंद मेढा पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक अमोल माने करत आहेत.
चौक टःबुधवारी रात्री चालकाला वळणाचा अंदाज न आल्याने हा अपघात झाला आहे.काळा कडा येथे असणाया या वळणाचा अंदाज नव्याने प्रवास करणाया वाहन चालकांना येत नाही .त्यामुळे येथे अपघातांचे प्रमाण वाढू लागले आहे. या परिसरात यापूर्वी ही मोठे अपघात झाले असून या अवघड वळणावर अजूनही सार्वजनिक बांधकाम विभागाने संरक्षक कठडे उभारले नाहीत. या ठिकाणी संरक्षक कठडे उभारण्याची आवश्यकता आहे.अजून किती अपघात झाल्यानंतर बांधकाम विभागाला जाग येईल असा सवाल वाहनचालकांनी उपस्थित केला आहे.