कधी कथेत घडणाऱया नाटय़मय घडामोडी किंवा कथा संपतेय असं वाटत असतानाही लांबत जाणारे एपिसोड, कधी किचन पॉलिटिक्सचा डोस तर कधी सहनशीलतेचा अंत पाहणारी सोशिकता अशा अनेक बाबतीत दैनांदिन मालिका सीमा ओलांडत असतात. सध्याही बहुतांशी मालिकांनी आपली सीमा ओलांडली आहे, पण तो मालिकेच्या कथेतील टवीस्टबाबत नव्हे तर थेट मालिकांचा सेट वरील संसारच हम तो चले परदेश म्हणत प्रवासाला लागला आहे. आम्ही ही करतोय प्रवास कारण तुमच्या मनोरंजनाचा प्रवास थांबू नये म्हणून अशी कॅप्शन देत कलाकारांनी त्यांचे सोशल मीडियावरील स्टेटस अपडेट केले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात लॉकडऊन लागलेल्या मालिकांनी गोवा, सिल्व्हासा, दमण, बेळगाव, गुजरात या अन्य राज्यातील शहरांमध्ये मुक्काम ठोकला आहे. मालिकांच्या या सीमोल्लंघनामुळे प्रेक्षकांचा लॉकडाऊन कंटाळवाणा होणार नसल्याने प्रेक्षकही खूश आहेत.
गेल्यावर्षी मार्च महिन्यात कोरोनाचा कहर वाढल्याने देशभर लॉकडाउन केले. त्यावेळी अचानक मालिकांच्या शूटिंगला ब्रेक लागल्यामुळे बॅकमध्ये असलेले एपिसोड संपल्यानंतर चॅनेलने मालिकांच्या जुन्या एपिसोडवर प्रेक्षकांच्या मनोरंजनाची तहान भागवली. पुन्हा लॉकडाउनमुळे शूटिंग करता येणार नसले तरी ज्या राज्यात लॉकडाउन नाही तेथे सेट हलवला असून आता सर्वच मालिकांची टीम अन्य राज्यात दाखल झाली.
सोशलमीडिया पेजवर कलाकारांनी त्यांच्या या आगळय़ावेगळय़ा प्रवासाच्या पोस्ट शेअर केल्या आहेत. पाहिले न मी तुला या मालिकेच्या सर्व टीमने विमानप्रवास करत गोवा गाठला आहे. सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेची टीम गोव्याला दाखल झाली आहे. या मालिकेतील माईच्या भूमिकेतील वर्षा उसगावकर यांना यानिमित्ताने त्यांच्या गोवा या जन्मभूमीत जायची संधी मिळाल्याने त्यांना हे सुख जास्तच मानवणार आहे. रंग माझा वेगळा, अगंबाई सूनबाई या मालिकांचा पुढचा एपिसोड गोव्याच्या किनारीच असणार. माझा होशील ना मालिकेतील ब्रम्हे फॅमिलीचा चमू सिल्व्हासामध्ये राहणार आहे. तर मुलगी झाली हो, सहकुटुंब सहपरिवार, सांग तू आहेस का यांचाही मुक्काम सिल्व्हासामध्ये असेल. आता शहर बदल्यामुळे नायक नायिकांची घरंही बदलणार आहेत.