प्रतिनिधी/ सातारा
छातीचा कोट करुन छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या काळात राज्यात साडेतीनशेहून अधिक किल्ले उभे केले. या किल्यांचे संवर्धन झाले पाहिजे याकरता सुक्ष्म आराखडा तयार करुन प्रत्यक्ष काम केले गेले पाहिजे. गडकिल्यांवर नेमके काय आहे याची माहिती देणारे प्रत्येक गडाच्या खाली संग्राहलय असे आवश्यक आहे. टप्याटप्याने गडसंवर्धनाची कामे केली जातील. पहिल्या टप्यात तोरणा, शिवनेरी, सिंधुदूर्ग, विजयदुर्ग आणि सुधागड या पाच किल्यांचा समावेश असून दुर्गप्रेमींनी दुर्ग संवर्धनाच्या कार्याला सुरुवात करा, असा आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी झुम मिटींगद्वारे दुर्गप्रेमींना आदेश दिले.
रविवारी दुपारी 12.30 वाजता राज्यातील 27 जिह्यातील अडीचशेहून अधिक दुर्गप्रेमींची झुम मिटींग मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली. या मिटींगचे सूत्रसंचालन आदेश बांदेकर यांनी केले. यामध्ये दुर्गप्रेमी मिलिंद गुणाजी, पांडुरंग बलकवडे, उमेश झिरपे, शिवराज्यभिषेक उत्सव समितीचे मार्गदर्शक दीपक प्रभावळकर, अद्वैत प्रभावळकर, वास्तल्य फौंडेशनचे शशिकांत पवार, धर्मवीर युवा मंचचे संस्थापक प्रशांत नलावडे यांच्यासह मान्यवर सहभागी झाले होते.
यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, राज्यातील गडकोटांचे सवंर्धन व्हावे यासाठी ही बैठक आयोजित केली आहे. त्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांनी साडेतीनशेहून अधिक गडकोट उभे केले. मावळय़ांनी छातीचा कोट करुन ते राखले. त्याच गडकोटांचे संवर्धन आपल्याला करायचे आहे. परदेशात जसे फोर्ट असतात त्या पद्धतीने नाही परंतु आपल्या गडकोटावर जी माहिती आहे, जी ठिकाणे आहेत. त्या ठिकाणांची माहिती एकत्रित देण्याकरता असे गडाच्या पायथ्याला छोटेसे संग्रहालय असावे. प्रत्येक गडाच्या संवर्धनासाठी एक टीम कार्यरत असावी. त्या टीममध्ये वनस्पतीप्रेमी, पक्षीप्रेमी यांचाही समावेश असावा, जेणेकरुन कास पुष्प पठारावर नैसर्गिक विविधता आढळून येते तशी काही गडावर असू शकते. आपल्या येणाऱया पुढच्या पिढीला गडकोटांचा इतिहास माहिती व्हावा यासाठी संवर्धन होणे गरजे आहे. त्याकरता आपण टीमवर्कने काम करुयात.
पहिल्या टप्यात तोरणा, शिवनेरी, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग आणि सुधागड घेवूयात. नुसत्या गप्पा गोष्टी नकोत तर प्रत्यक्ष काम करुयात. आराखडा तयार करुन पुढची बैठक घ्या. अडीअडचणीचा पाढा नको तर सोडवणुकीचा पाढा हवा, आता काम करायचे आहे. प्रत्येकाने संवर्धन करायचे आहे. टप्याटप्याने कामे होतील. पुढे सरकार आहे, असे सांगितले.
गिरीश टाकळे यांनी दिर्घकालिन दुर्ग संवर्धनाचा विचार करावा, काल सुसंगत काम करावीत. मुख्यमंत्री कलावंत आहेत, ते काम करतील. दुर्गप्रेमींनी सयंम ठेवावा, असे सांगितले तर प्रकाश नारकर यांनी सिंधुदुर्ग किल्याची महती सांगत प्लास्टिक कचऱयावर कायम तोडगा निघला पाहिजे, असे सांगितले.
दुर्ग संवर्धनासाठी राज्यस्तरीय समिती व्हावी
दुर्ग संवर्धनासाठी स्वतः मुख्यमंत्री सक्रिय झाल्याने सर्व दुर्गप्रेमींच्या वतीने उद्धव ठाकरे यांचे स्वागत करतो. मात्र केवळ उच्चतंत्र वापरून यावर चर्चा होण्यापलीकडे संवर्धन करणाऱया संस्थांना बळ देण्याची गरज आहे. त्यासाठी अशा संस्थांची राज्यस्तरीय समिती आवश्यक आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक किल्ल्यावर काम करणाऱया संस्था आहेत त्यांची साखळी निर्माण करून त्या-त्या संस्थांच्या माध्यमातूनच हे घडू शकते. राज्य शासनाने उचललेल्या या पावलाला पक्ष, संस्था अशा भेदांच्या पुढे जाऊन दुर्गप्रेमी सहकार्य करतील.