बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यासह राजधानी बेंगळूरमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. राज्यात कोरोनाविषयक नियम कडक करण्यात आले आहे. तरीही नागरिकांकडून नियमांचे उल्लंघन केलं जात आहे. राजधानीत १ ते ८ एप्रिल दरम्यान मास्क न घालणे आणि सामाजिक अंतर न पाळल्याप्रकरणी पोलिसांनी १८,२३८ जणांवर गुन्हा दाखल केला असून त्यांच्याकडून ४५ लाखांहून अधिक दंड वसूल केला आहे. पश्चिम विभागात सर्वाधिक कोरोना नियमांचं उल्लंघन झालं आहे. याठिकाणी ६,१२१ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. राज्यात कोरोना प्रकरणे वेगवान दराने वाढत असताना, तज्ञांनी आरोग्य-सुरक्षा प्रोटोकॉलची कठोर अंमलबजावणी करण्याची मागणी केली आहे. १८,२३८ प्रकरणांपैकी बहुतांश घटना मास्क न घातल्याच्या असून त्यांना २.९ लाख रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. तर सुरक्षित अंतर न ठेवल्याबद्दल अधिकाऱ्यांनी १,०४४ जणांवर कारवाई करत २.६ लाख रुपये दंड ठोठावला आहे.