वार्ताहर / राजापूर
सुरूवातीला झालेल्या विरोधामुळे रद्द झालेल्या राजापूर तालुक्यातील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पासाठी सद्यस्थितीत नाणार व बारसू अशा दोन्ही ठिकाणी चढाओढ सुरू असताना आता हा प्रकल्प मिनी स्वरूपात सिंधुदुर्गात होण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे राजापूर तालुक्यात नाणारप्रमाणे बारसू, सोलगाव परिसरात प्रकल्पाला विरोध झाल्यास हा प्रकल्प सिंधुदुर्गात जाण्याची शक्यता आहे. त्यातच आता केंद्रीय लघु, मध्यम, सुक्ष्म उद्योगमंत्रीपदी नारायण राणे यांची नियुक्ती झाल्याने या प्रकल्पाचा सिंधुदुर्गातील मार्ग अधिक सुकर होण्याची शक्यता आहे.
राजापूर तालुक्यातील बहुचर्चित अशा रिफायनरी प्रकल्पावरून सध्या राजापूर तालुका चांगलाच चर्चेत आला आहे. नाणारमधील विरोधानंतर हा प्रकल्प बारसू, सोलगाव पंचक्रोशीत होण्यासाठी प्रयत्न सुरू असताना नाणारप्रमाणे या भागातही काही एनजीओंनी ग्रामस्थांमध्ये प्रकल्पाच्या विरोधात प्रचार करून त्यांना प्रकल्पाच्या विरोधात उभे करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे. नाणार परिसरात रिफायनरी प्रकल्पासाठी सुमारे साडेआठ हजार एकर जागेची संमतीपत्रे शेतकऱयांनी दिली आहेत. मात्र नाणार प्रकल्पाला शिवसेनेचा ठाम विरोध असल्याने प्रकल्प समर्थकांनी कितीही घसा कोरडा केला तरी या परिसरात प्रकल्प होण्याची शक्यता फारच कमी आहे. त्यामुळे आता बारसू, सोलगाव, देवाचे-गोठणे, शिवणेखुर्द भागात रिफायनरी प्रकल्प व्हावा, यासाठी या परिसरातील स्थानिक ग्रामस्थ व प्रकल्प समर्थक आपली ताकद पणाला लावत आहेत. मात्र बारसू-सोलगांव भागाच्या पर्यायी जागेचा विचार सुरू होताच पुन्हा एनजीओंनी आपला मोर्चा येथे वळवत ग्रामस्थांमध्ये प्रकल्पाच्या विरोधात वातावरण तयार करण्यास सुरूवात केली आहे. नाणारमधील एनजीओ आणि तेथील प्रकल्पविरोधकच यामागे असल्याचे स्पष्ट झाले आहे. एनजीओंच्या प्रकल्पविरोधी प्रचाराला बळी पडलेले ग्रामस्थ प्रकल्पाची दुसरी बाजू समजून घेण्यास पुढेच येत नाही. त्यामुळे विरोध वाढत जाऊन पुढे प्रकल्पाला अडथळे निर्माण होतात.
नाणारप्रमाणे बारसू-सोलगांवमध्येही ग्रामस्थ प्रकल्पविरोधी भूमिका घेवू लागल्याने आता हा प्रकल्प सिंधुदुर्गात मिनी स्वरूपात उभारण्यासाठीही हालचाली गतीमान झाल्या आहेत. सिंधुदुर्गात 4 हजार एकर जागेची ग्रामस्थांची संमती असून प्रकल्पाला आवश्यक विजयदुर्ग बंदरनजीक असल्याने या जागेचा एक विचारही पुढे येत आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सव्वा लाख रोजगार निर्माण करणारा रिफायनरी प्रकल्प होणारच, अशी गर्जना नुकतीच जनआशीर्वाद यात्रेदरम्यान राजापुरात केली होती. यावेळी त्यांनी नाणार होणारच, असे स्पष्ट केले होते तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही राजापूरच्या दौऱयात नाना नाणार करणार, अशी भूमिका मांडली होती. भाजपाने या प्रकल्पाला आधीच पाठिंबा दर्शवला असून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तर खुलेपणाने प्रकल्पाला समर्थन दर्शवले आहे. रिफायनरी कंपनीसमोर आता 20 मेट्रीक टनच्या मिनी रिफायनरीसाठी सिंधुदुर्गचा पर्याय सिध्द असल्याने हा प्रकल्प नाणार, बारसू कि सिंधुदुर्गपैकी नेमका कोठे साकारणार आहे, त्याची घोषणा नजीकच्या काळात होण्याची शक्यता आहे.