घरे, दुकानांवरची पत्रे उडाली, जनजीवन विस्कळीत
प्रतिनिधी / मिरज
दिवसभराच्या तीव्र उष्म्याअंतर मंगळवारी सायंकाळी पावणेपाच वाजल्यापासून मिरज शहर आणि परिसरात तुफानी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. विजांच्या कडकडाटासह वेगवान वाऱ्यामुळे रहिवाशी वस्तीतील घरांवरील पत्रे आणि मार्केट परिसरातील काही दुकानांवरील पत्रे उडून गेली. या तुफान वादळी पावसामुळे मिरज शहर आणि परिसरात पाणी पाणी झाले, जनजीवन विस्कळीत झाले. अद्यापही पावसाची रिपरिप सुरूच आहे. गेल्या काही दिवसांपासून आग ओकणाऱ्या उन्हामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना या वादळी पावसामुळे दिलासा मिळाला आहे. मात्र ग्रामीण भागातील वादळी वाऱ्यामुळे काही शेती पिके आडवी झाल्याने शेतकर्यांचे नुकसान झाले आहे.