प्रथमच मिस इंडियासाठी सोलापुरातील स्पर्धकाची निवड
भारतातून 26 स्पर्धक सहभागी होणार : जयपूर, दिल्लीमध्ये होणार पुढील स्पर्धा
तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
विविध क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी सोलापूरचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचवले आहे. मात्र मिस इंडिया अंतिम स्पर्धेत आतापर्यंत सोलापूरच्या कुणाचीही निवड झाली नव्हती. परंतु सोलापूरच्या इतिहासात प्रथमच `मिस इंडिया’ 2021 या अंतिम स्पर्धेसाठी मूळची सोलापूरची ईशा वैद्य हिची निवड झाली आहे. विशेष म्हणजे भारतामधील एकूण 26 स्पर्धकांची निवड झाली असून यामध्ये सोलापूरच्या ईशाचे नाव असल्यामुळे सोलापूरसाठी अभिमानास्पद बाब आहे.
ईशा वैद्य ही सोलापुरातील ज्येष्ठ पत्रकार रंगाण्णा वैद्य यांचे पुतणे डॉ. अभय वैद्य यांची मुलगी आहे. कोणत्याही प्रकारचे मार्गदर्शन व वारसा नसताना ईशा हिने मिस इंडियाच्या अंतिम स्पर्धेपर्यंत मजल मारली आहे. ईशाचे शालेय शिक्षण ज्ञानप्रबोधिनी शाळेत झाले. पुणे येथे मिस इंडियाच्या स्पर्धेसाठी दोन वर्षे प्रशिक्षण घेतले. 13 फेब्रुवारी रोजी अंतिम स्पर्धेसाठी निवड झाली. 16 ते 18 ऑगस्टपर्यंत जयपूरमध्ये स्पर्धा होणार आहे. त्यापुढे 19, 20, 21 ऑगस्ट रोजी दिल्ली येथे स्पर्धा होणार आहे.
ईशा वैद्य हिची मिस इंटरनॅशनल, मिस मल्टिनॅशनल, मिस ग्रॅड मल्टिनॅशनल, मिस टुरिझम इन एशिया स्पेसिफिक यामधून निवड झाली आहे. ग्रामीण भागातून येऊन मिस इंडिया स्पर्धेच्या अंतिमसाठी निवड झाल्यामुळे सर्वत्र तिचे कौतुक होत आहे.
सोलापूरसाठी अभिमानाची बाब
मिस इंडिया स्पर्धेसाठी माझी मुलगी ईशा वैद्य हिची अंतिम स्पर्धेसाठी निवड झाली आहे. सोलापूरसाठी ही मोठी बाब आहे. सोलापूरच्या इतिहासात प्रथमच निवड झाली आहे. यासाठी दोन वर्षे तिने मेहनत घेतली. मिस इंडिया स्पर्धेसाठी सोलापुरातील मुली भविष्यात चमकू शकतात. मात्र अशा ग्रामीण भागातील मुलींसाठी प्रशिक्षण देण्याची गरज आहे.
– डॉ. अभय वैद्य, सोलापूर