ऑनलाईन टीम / मुंबई :
भारतात आता कोरोनाचा प्रादुर्भाव हळूहळू कमी होताना दिसत आहे. त्यामुळे अनेक राज्यांमध्ये अनलॉकच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रात देखील अनलॉकची प्रक्रिया सुरू आहे. मुंबईत देखील कोरोना संसर्गाचा दर कमी झाला आहे. मुंबईकारांसाठी ही जरी दिलासादायक बाब असली तरी मुंबईत कोरोनाचे निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत.
त्यातच सध्या सर्वांनाच लोकल कधी सुरु होणार याची प्रतिक्षा लागली आहे. अद्याप लोकलने प्रवास करण्याची परवानगी मिळत नसल्याने अनेक चाकरमान्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. यामुळे मुंबईची लोकल कधी सुरु होणार असा प्रश्न विचारला जात आहे. त्यातच आता मुंबईकरांना अजून लोकल प्रवासासाठी मोठी प्रतिक्षा करावी लागणार आहे, याबाबतचे संकेत मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सोमवारी दिले आहेत. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
यावेळी वडेट्टीवार यांनी कोरोना संपल्याशिवाय मुंबईची लोकल सुरू होणार नाही, असे स्पष्टपणे सांगितले आहे. त्यामुळे मुंबईकरांना लोकल प्रवासासाठी मोठी प्रतिक्षा करावी लागण्याची शक्यता आहे.
दरम्यान, राज्यात जरी कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असली तरी दुसऱ्या बाजूला डेल्टा प्लस व्हेरियंटचे रुग्ण हळूहळू आढळत आहेत. त्यामुळे तज्ज्ञ कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवत आहे. त्यामुळे राज्य सरकार मुंबई लोकल संदर्भातील निर्णय लांबणीवर टाकताना दिसत आहे. कारण लोकल सुरू झाली की, मुंबईतील गर्दी वाढू शकते. तसेच आजूबाजूच्या एमएमआरसीटीमधील लोकांची गर्दी मुंबईत वाढेल. त्यामुळे राज्य सरकार लोकल संदर्भात हळूहळू पाऊले उचलताना दिसत आहे.