ऑनलाईन टीम / मुंबई :
मुंबईत सलग दुसऱ्या दिवशीही पावसाचा जोर कायम आहे. उद्या देखील पावसाचा जोर कायम राहील असे म्हणत मुंबईसह ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर पश्चिम किनारपट्टीसह उत्तर कोकणाला अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
या पार्श्वभूमीवर मुंबईकरांनी विनाकारण घराबाहेर पडू नका, सावधानता बाळगा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला केले आहे. मुख्यमंत्र्यांनी राज्यभरातील पावसाचा आढावा घेत पालकमंत्र्यांना आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. मुंबई, ठाणे, पालघरमध्ये एनडीआरएफची प्रत्येकी एक टीम तैनात असून संपूर्ण राज्यात 15 टीम तैनात करण्यात आल्या आहेत.
दरम्यान, मुंबईत काल पासूनच वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडतो आहे. मुंबईत कालच्या दिवसात घरे, झाडे पडण्याच्या अनेक घटना घडल्या. तुफान पावसाने मुंबईची अक्षरशः पुरेवाट झाली. गेल्या दोन दिवसापासून सलग पाऊस कोसळत आहे.
या पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचले असल्याने शहरातील अनेक रस्ते जलमय झाले आहेत. रस्त्यांना नदीचे स्वरूप आले आहे. हिंदमाता, दादर, मरीन ड्राईव्ह परिसर, नालासोपारा पूर्व सेंट्रल पार्क, नागीनदास पाडा, तुलिंज, आचोले, विरार पूर्व चंदनसार, पश्चिम विवा कॉलेज रोड, एम बी इस्टेट, वसई पश्चिम समता नगर, पार्वती क्रॉस रोड, सागरशेत, वसई पूर्व नवजीवन, सातीवली परिसरातील जोरदार पाऊस सुरू आहे. रात्रभर पडणाऱ्या पावसामुळे विजेचाही लपंडाव सुरु आहे. पावसाचा जोर अजूनही कायम आहे.