ऑनलाईन टीम मुंबई :
दादरच्या इंदू मिल येथे आयोजित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचा पायाभरणी सोहळा पुढे ढकलण्यात आला आहे, अशी माहिती एमएमआरडी कडून देण्यात आली. याबाबत एम एम आरडी कडून ट्विट करण्यात आले आहे.
दरम्यान, दादर येथील इंदू मिल येथे आज दुपारी 3 वाजता मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचा पायाभरणी सोहळा पार पडणार होता.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केवळ 16 जणांनाच या कार्यक्रमाचे आमंत्रण होते. यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, अन्नपुरवठा मंत्री छगन भुजबळ, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, वर्षा गायकवाड, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनाच निमंत्रण देण्यात आले होते.
यामध्ये बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू आनंदराज आंबेडकर आणि प्रकाश आंबेडकर यांचे ही नाव नसल्याने ते नाराज होते. मात्र अखेरच्या क्षणी आनंदराज यांना निमंत्रण देण्यात आले. मात्र, या कार्यक्रमासाठी आंबेडकर चळवळीतील कोणालाही आमंत्रित करण्यात आले नव्हते. तसेच अन्य मंत्र्यांना याची माहिती दिली नसल्याने नाराजीचे वातावरण होते. अखेर हा सोहळा पुढे ढकलण्यात आला आहे.