ऑनलाईन टीम / मुंबई :
गेल्या महिनाभरात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. सध्या अधिक व्हेंटिलेटरची गरज आहे. असे चित्र समोर येत आहे. त्यामुळे राज्य सरकारने तात्काळ व्हेंटिलेटर पुरवावेत. तसेच महापालिका आणि राज्य सरकारमध्ये समन्वय हवा, असे मत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.
देवेंद्र फडणवीस यांनी आज पनवेल आणि नवी मुंबईचा दौरा केला. यावेळी त्यांनी या भागातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. पुढे ते म्हणाले, एमएमआर क्षेत्रात टेस्टिंगची संख्या वाढवण्याची गरज आहे.
सरकारने दोन किलोमीटरची अट आत्ताच बंद केली याबद्दल बोलताना ते म्हणाले, हे प्रॅक्टिकलच नव्हते. ही दोन किलमीटरची अट ही कशाच्या आधारावर आली, हे कळत नाही. कारण हे छोट्याश्या गावामध्ये ठीक आहे. पण मुंबई, एमएमआरमध्ये छोट्या छोट्या गोष्टींना बाहेर जावं लागले तर ते दोन किलोमीटर तर आरामात जावं लागते आणि आता आपण अनलॉक केले आहे आणि या अनलॉक मध्ये लोकांनी कामावर जायचंय, आर्थिक व्यवहार करायचे आहेत, अशा परिस्थितीमध्ये जी दोन किलोमीटरची ठेवली अट होती ती इन प्रॅक्टिकल होती. ती का आली याचा अंदाज नाही पण आता ती रद्द केली आहे, ते योग्य आहे असे ही त्यांनी यावेळी सांगितले.
वाहन खरेदीबाबत बोलताना फडणवीस म्हणाले, वाहन खरेदी हे सरकारची प्राथमिकता असू शकत नाही. सरकारचे प्राधान्य नेमके कशाला आहे असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.