मुंबई / ऑनलाईन टीम
मुंबई महापालिकेच्या कोरोना व्यवस्थापनाचं सर्वोच्च न्यायालयापाठोपाठ आता केंद्र सरकारच्या नीती आयोगाचे सीईओ अमिताभ कांत यांनी कौतुक केलं आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी महापालिका आयुक्तांच व त्यांच्या सर्व टीमचं अभिनंदन केले आहे.
अमिताभ कांत यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, केंद्रीय पद्धतीने बेडचं वाटप करणं, ऑक्सिजन साठवणुकीच्या सुविधांचा अंदाज घेणं, इतकंच नाही तर खासगी रुग्णालयातील बेडचंही वाटप करणं आणि त्यावर देखरेख ठेवण्यासाठी डॅशबोर्ड तयार करणं, रुग्णांच्या तब्येतीबद्दल पाठपुरावा करण्यासाठी वॉर रुम निर्माण करणं. मुंबईचं कोरोना व्यवस्थापन मॉडेल प्रेरणादायी आहे. मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल आणि त्यांच्या ग्रेट टीमचं अभिनंदन, अशा शब्दात त्यांनी कौतुक केले आहे.
दिल्लीतील ऑक्सिजन तुटवड्यासंदर्भातील याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने मुंबईतील कोरोना व्यवस्थापन मॉडेलचा दाखला दिला होता. न्या. चंद्रचूड आणि न्या. एम. आर. शाह यांच्या दोन सदस्यीय खंठपीठासमोर झालेल्या सुनावणीत न्यायालयाने कोरोना व्यवस्थापनासंदर्भात मुंबई महापालिकेनं तयार केलेलं मॉडेल देश आणि राज्यस्तरावर शक्य आहे का?, अशी विचारणा सर्वोच्च न्यायालयाने केली होती.