लोकमान्य एज्युकेशनच्या इमारतीचा पर्याय विचाराधीन
आमदार दीपक केसरकर यांची माहिती
झारापला इमारतीसाठी काही वर्षे लागतील
सागरी संशोधन केंद्र वेंगुर्ल्यात सुरू होणार
मुंबईत आज होणाऱया बैठकीत निर्णय
वार्ताहर / सावंतवाडी:
सिंधुदुर्ग जिल्हय़ात मुंबई विद्यापीठाचे उपकेंद्र सावंतवाडी-मळगाव येथील लोकमान्य एज्युकेशनच्या शैक्षणिक उपक्रमाच्या इमारतीत लवकरच सुरू केले जाणार आहे. तसेच सिंधु स्वाध्याय अंतर्गत सागरी संशोधन केंद्र वेंगुर्ले कॅम्पमधील जागेत सुरू करण्याच्या दृष्टीने सोमवार आठ मार्चला राज्याचे तंत्रशिक्षणमंत्री व जिल्हय़ाचे पालकमंत्री उदय सामंत आणि प्रमुख अधिकाऱयांसमवेत मुंबईत बैठक होणार आहे. त्यानंतर हे दोन्ही महत्वाकांक्षी प्रकल्प मार्गी लागणार आहेत, अशी माहिती आमदार दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी शिवसेना नेते तथा जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत, राष्ट्रवादीचे नेते व्हिक्टर डान्टस, अशोक दळवी उपस्थित होते. केसरकर पुढे म्हणाले, आपण पालकमंत्री असताना जिह्याच्या विकासासाठी मोठय़ा प्रमाणात निधी आणला. अनेक प्रकल्प मंजूर करून आणले. परंतु आता सदर प्रकल्प रखडले आहेत. हे
प्रकल्प मार्गी लावण्याच्या दृष्टीने आपण मुंबईत आमदारांसमवेत बैठक घेणार आहोत. मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्रासाठी झाराप येथे जागा निश्चित करण्यात आली आहे. परंतु तेथे इमारत पूर्ण होण्यासाठी दोन ते अडीच वर्षांचा कालावधी जाईल. तोपर्यंत लोकमान्य एज्युकेशनच्या जागेत हे उपकेंद्र लवकरात लवकर सुरू करण्याचे प्रयत्न आहेत. तसेच सागरी संशोधन केंद्रही सुरू करण्यासाठी बैठक मुंबईत घेतली जाणार आहे. त्यामुळे लवकरच प्रकल्प सुरू होणार आहेत.
उपवनसंरक्षक चव्हाण यांच्या चौकशीची मागणी करणार
जिल्हय़ात वनविभागाच्या विकासकामांसाठी व सौर कंपन्यांसाठी कोटय़वधी रुपयांचा निधी मी दिला होता. दोडामार्ग येथे प्राणी संशोधन केंद्र मंजूर झाले होते. केरळच्या धर्तीवर सौरकुंपणासाठी 28 लाख रुपये मंजूर केले होते. परंतु उपवनसंरक्षक समाधान चव्हाण यांच्या भोंगळ कारभारामुळे व निक्रियतेमुळे सौरकुंपण पूर्णपणे निकृष्ट झाले आहे. त्यामुळे चव्हाण यांची सखोल चौकशी करण्याबाबत आपण बुधवारी महासचिवांची भेट घेऊन मागणी करणार आहोत. वन खात्यात समाधान चव्हाण यांच्या कारकीर्दीत अनेक कामे निकृष्ट दर्जाची झाली आहेत. त्याची सखोल चौकशी करण्याची मागणी केली जाणार आहे, असे केसरकर यांनी स्पष्ट केले. हत्ती, माकड यांच्यापासून शेती-बागायतीचे नुकसान होत आहे. त्यासंदर्भात आपण सचिवांशी चर्चा करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
पदासाठी लाचार होणार नाही!
वनमंत्री संजय राठोड यांच्या रिक्त झालेल्या पदी आपली वर्णी लागणार का, असे विचारले असता, मी कुठल्याही पदासाठी कोणाकडेही लाचारी करणार नाही. पद असो वा नसो, मी जनतेसाठी काम करत राहणार आहे. मी पालकमंत्री असताना या जिह्यासाठी ‘चांदा ते बांदा’ योजना कार्यान्वित करून कोटय़वधी रुपयांचा निधी आणला. परंतु ही योजना बंद करून निधीही अडविण्यात आला. याचे शल्य माझ्या मनात कायम आहे. हा निधी कसा परत आणता येईल, त्यादृष्टीने आपले प्रयत्न आहेत.
राणेंनी जनहितासाठी पैसा वापरावा!
माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर बेतालपणे बोलत आहेत. त्यांच्या मेडिकल कॉलेजला ठाकरे यांनीच परवानगी दिली आणि त्यांच्यावर असे बोलत आहेत. राणे यांच्याकडे जो पैसा आहे, तो त्यांनी जनतेच्या हितासाठी खर्च करावा, असेही केसरकर उपरोधिकपणे म्हणाले.
मी दिलेला उमेदवार निवडून आणा!
सावंतवाडी शहरातील जनतेचे माझ्यावर प्रेम कायम आहे. ते माझ्या निवडणुकीत मला भरघोस मतदान करतात व माझ्या पाठीशी कायम राहतात. आता मी नगरपालिकेच्या निवडणुकीत जो उमेदवार देईन, त्या उमेदवाराच्या पाठीशी तुम्ही खंबीरपणे राहा. जसे माझ्यावर तुम्ही प्रेम करता, त्याप्रमाणे मी दिलेला उमेदवार निवडून आणा. मी आता या शहराच्या विकासासाठी साडेसात कोटी रुपयांचा निधी दिला आहे. शहरात जी विकासकामे व प्रकल्प झाले आणि सुरू आहेत, ते सर्व या निधीतून. त्यामुळे कोणी उगाच काही बाता मारू नयेत. तुम्ही निधी कुठून आणणार, असा सवाल त्यांनी नगराध्यक्ष संजू परब यांना केला.