राजस्थानहून बेळगावात उंट घेऊन आलेले अडचणीत : पोटा-पाण्याचा प्रश्न गंभीर
प्रतिनिधी / बेळगाव
लॉकडाऊनचा फटका मनुष्यासोबतच आता मुक्मया जनावरांनाही बसू लागला आहे. राजस्थान येथून 15 दिवसांपूर्वी आलेल्या उंटांना लॉकडाऊनमुळे आता बेळगावमध्येच ठिय्या मारावा लागला आहे. रस्त्यावर लोक येत नसल्याने पैसे कोठून जमवायचे व उंटांना काय खाऊ घालायचे? असा प्रश्न त्यांच्या मालकांसमोर आहे. वाटेत दिसेल ती व्यक्ती फळे व इतर पदार्थ त्या उंटांना घालत असले तरी वेळच्या वेळी खाणे मिळत नसल्याने त्यांची परिस्थिती बिकट झाली आहे.
उंटाचे आकर्षण हे प्रत्येकालाच असते.उंटावर बसून सवारी करायची लहान मुलांची इच्छा असते. त्यामुळेच हजारो किलोमीटरचा प्रवास करून उंट विविध शहरांमध्ये दाखल होतात. उंटावरून सवारी केल्यानंतर 50 ते 60 रुपये उंटाचा मालक घेतो. यातून तो आपली व उंटांची व्यवस्था करीत असतो. लॉकडाऊनपूर्वी काही उंट बेळगावमध्ये दाखल झाले. पहिले काही दिवस लॉकडाऊनचे नियम शिथिल असल्याने नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत होता. परंतु 10 मेपासून लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी केल्यामुळे या प्राण्यांना बाहेर पडणेही कठीण झाले. नागरिक घरांमध्ये असल्याने हे उंट फिरवणार तरी कुठे, असा प्रश्न त्यांच्या मालकांसमोर आहे. त्यामुळे मालकांसोबतच उंटांचीही खाण्या-पिण्याची समस्या सुरू आहे. त्यामुळे लॉकडाऊन केव्हा संपणार या प्रतीक्षेत उंटांचे मालक आहेत.