मुंबई \ ऑनलाईन टीम
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई लोकलबाबत मोठी घोषणा केली आहे. येत्या 15 ऑगस्टपासून मुंबई लोकल अटी शर्थींसह सुरु होणार आहे. मुख्यमंत्र्यांनी मुंबई लोकलबाबात घोषणा करताच भाजप आमदार नितेश राणे यांनी ‘दुनिया झुकती हैं, झुकानेवाला चाहिए!’, असं म्हणत त्यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे.
ये लगा सिक्सर… मुंबई भाजपच्या आंदोलनाला यश…येत्या 15 ऑगस्टपासून मुंबई लोकल सुरु होतीय… ‘दुनिया झुकती हैं, झुकानेवाला चाहिए!’, असं ट्विट करुन नितेश राणेंनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. हे ट्विट करताना त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, आमदार प्रसाद लाड, आमदार आशिष शेलार आणि मुंबई भाजप अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांना टॅग केलं आहे.
मुंबईतील ज्या नागरिकांनी लसीचे दोन डोस घेतले आहेत. अशा नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. १५ ऑगस्टपासून पहिल्या टप्प्यात लसवंतांना लोकल प्रवासाची परवानगी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे की, मुंबईमध्ये लोकल प्रवास सुरु करतो आहोत. आपल्या स्वातंत्र्य दिनापासून सुरु करत आहोत. मात्र तो करताना पहिल्या टप्प्यात ज्यांनी लसीचे दोन डोस घेतले तसेच ज्यांना लस घेऊन १५ दिवस झाले आहेत त्यांच्यासाठी मुभा देण्यात येत आहे.
कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर अनेक नियम शिथील करण्यात आले. मात्र, मुंबईची लोकल ट्रेन बंद होती. याच पार्श्वभूमीवर मुंबई आणि ठाण्यात भाजपचे नेते, आमदार व कार्यकर्ते पदाधिकारी रस्त्यावर उतरले. प्रवीण दरेकर, अतुल भातखळकर, मंगलप्रभात लोढा यांनी लोकल सुरू करावी म्हणून आंदोलन केले.