पुती गावकर यांची घोषणा : नवनिर्माण आघाडीची स्थापना : खाण पट्टय़ात भाजपाविरोधात लढणार
प्रतिनिधी / फोंडा
येणाऱया विधानसभा निवडणुकीत खाण पट्टय़ातील व अभयारण्य क्षेत्रात येणाऱया सर्व मतदार संघामध्ये भाजपा विरोधात उमेदवार उभे केले जातील. भाजपा उमेदवाराला टक्कर देऊ शकेल अशा इतर पक्षातील सक्षम उमेदवारालाही पाठिंबा देण्याचा विचार आहे. सर्व पक्षांनी पाठिंबा दिल्यास आपण स्वतः साखळीतून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याविरोधात निवडणुकीत उतरण्याची घोषणा कामगार नेते पुती गावकर यांनी केली आहे.
गोवा राज्य नवनिर्माण आघाडी या नव्याने स्थापन केलेल्या मंचचे उद्घाटन केल्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. राज्यातील खाण अवलंबिताचा प्रश्न व शेतकऱयांच्या जमिन मालकी हक्काच्या मुद्दय़ावर नवनिर्माण आघाडी स्थापन करण्यात आली आहे. विधानसभा निवडणूक याच मंचच्या माध्यमातून लढविली जाणार आहे. खाण अवलंबितांचा प्रश्न, गोव्यातील भूमीपुत्र शेतकऱयांचे जमीन हक्क, बेरोजगारी हे निवडणुकीचे प्रमुख मुद्दे असतील. भाजपा विरोधात मगो, आप किंवा अन्य समविचारी पक्षांच्या पाठिंब्यावर निवडणूक लढविण्याचे संकते नवनिर्माण आघाडीचे समन्वयक पुती गावकर यांनी दिले.
भाजपाच्या कार्यकाळात गोवा दहा वर्षे मागे
भाजपा सरकारच्या कार्यकाळात गोवा दहा वर्षे मागे गेला आहे. सन 2012 पूर्वी गोव्यात जी श्रीमंती होती. लोकांच्या हाती पैसा होता. खाण व्यवसाय बंद झाल्याने गोव्याची पुरती वाताहत झाली आहे. रोजगार देणारे उद्योग धंदे आणण्यात या सरकारला पूर्ण अपयश आले आहे. बेरोजगारी 29.2 टक्क्यांवर आली असून जी पूर्वी 4 ते 5 टक्के एवढी होती. राज्याचे दरडोई उत्पन्न मोठय़ा प्रमाणात घटले आहे. यापूर्वी दरडोई उत्पन्नामध्ये गोवा 1 किंवा 2 क्रमांकावर असायचा. राज्याच्या डोक्यावर सध्या 40 हजार कोटींचे कर्ज आहे. भाजपा सरकारच्या कार्यकाळात खासगी क्षेत्रात रोजगाराच्या सर्व वाटा बंद झाल्या असून सरकारी नोकऱया पेसे घेऊन विकल्या जात आहेत. सरकार भष्टाचारात आकंठ बुडाल्याचा आरोपही त्यांनी केला.
खाणी, पर्यटन व उद्योगांची वाताहत
राज्यातील शेतकऱयांना जमीन हक्क देण्यास तसेच खाणी पूर्ववत सुरु करण्यास या सरकारला कुठलीच इच्छा दिसत नाही. सन् 1971 मध्ये झालेल्या सर्वेक्षणामध्ये बहुतेक शेतकऱयांची नावे नोंद झालेली नाही. त्यामुळे अनेक पिढय़ांपासून ते कसत आलेल्या जमिनींवर त्यांचा हक्क राहिलेली नाही. महाराष्ट्र राज्यात इंग्रजाच्या काळापासून शेतकऱयांच्या ऑनलाईन नोंदी सापडतात. गोव्यातील शेतकऱयांना जमिन मालकीचा हक्क अद्याप न मिळाल्याने त्यांना कुठल्याच योजनेचा लाभ मिळत नाही. गेल्या दहा वर्षात गोव्यात रोजगार देणारा एकही उद्योग धंदा आलेला नाही. त्यामुळे बेरोजगारी मोठय़ा प्रमाणात वाढली आहे. कामगार विरोधी कायदे व कंत्राटीपद्धतीमुळे स्थानिकांचे रोजगार हिसकावून घेतले जात आहेत. गोमंतकीयांना जगण्याचा आधार असलेली शेती, पर्यटन, खाण व उद्योग या सर्वच क्षेत्रांची भाजपा सरकारने वाताहात करून टाकलेली आहे. गोमंतकीयांचे हे सर्व प्रश्न घेऊन नवनिर्माण आघाडी निवडणूक लढविणार असल्याची घोषणा पुती गावकर यांनी केली.
धारबांदोडा तालुक्यात मगोचे संभाव्य उमेदवार विनायक उर्फ बालाजी गावस हे खाण अवलंबित मंचचे सक्रीय सदस्य असल्याने त्यांना नवनिर्माण आघाडीतर्फे पाठिंबा देणार असल्याची माहिती पुती गावकर यांनी दिली.