भारत वि. न्यूझीलंड जागतिक कसोटी चॅम्पियनशिप फायनल
विवेक कुलकर्णी
1983 मध्ये भारताने विश्वचषक जिंकला, त्यावेळी कपिलदेव, मोहिंदर अमरनाथ, रॉजर बिन्नी, कीर्ती आझाद, मदनलाल या अष्टपैलू धुरंधरांनी सिंहाचा वाटा उचलला होता. ज्याप्रमाणे फक्त फलंदाज प्रत्येक वेळी सामना जिंकून देऊ शकत नाही, त्याचप्रमाणे फक्त गोलंदाजही प्रत्येक वेळी विजयश्री खेचून आणू शकत नाहीत. अष्टपैलू खेळाडू मात्र दोन्ही बाजूंनी तितकेच उपयुक्त ठरतात, हा याचा मथितार्थ. आता भारतीय संघ 18 जूनपासून न्यूझीलंडविरुद्ध जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत लढेल, त्यावेळी देखील असे अष्टपैलू खेळाडूच संघाची नौका विजयाच्या पैलतीरी पोहोचवू शकतात.
हिटमॅन रोहित भारतीय फलंदाजीचा कणा ः तीन वर्षांपूर्वी भारताचा संघ इंग्लंड दौऱयावर गेला होता, त्यावेळी रोहित शर्माला त्या संघातून वगळले गेले होते आणि हिटमॅनची कसोटी कारकीर्द संपली, अशी हाकाटी एव्हाना सुरु झाली होती. पण, वर्षभरातच दक्षिण आफ्रिकेचा संघ भारत दौऱयावर आला, त्यावेळी रोहित सलामीवीर म्हणून संघात आला आणि त्याने ओपनिंग स्लॉट जणू आपल्या नावावरच करुन टाकली. टी-20 व वनडेनंतर आता कसोटीतही रोहित हाच आपला हुकमी एक्का आहे, यातच सारे काही आले!
जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये रोहितने 17 डावात 64.37 च्या सरासरीने 1030 धावा फटकावल्या असून यात त्याने 4 शतके व 2 द्विशतके झळकावली आहेत. इंग्लंडविरुद्ध मागील मालिकेत आव्हानात्मक खेळपट्टय़ांवर रोहितने धमाकेदार फलंदाजी साकारली होती. त्यामुळे, न्यूझीलंडविरुद्ध फायनलमध्ये तो भारतीय फलंदाजीचा कणाच असणार आहे.
शुभमन गिल की मयांक?
या धडाकेबाज युवा फलंदाजाने 3 आक्रमक अर्धशतकांसह आपल्या कसोटी कारकिर्दीला तितकीच धमाकेदार सुरुवात केली आहे. गब्बा कसोटीत त्याची 91 धावांची खेळी निव्वळ लाजवाब ठरली होती. नंतर इंग्लंडविरुद्ध घरच्या मैदानावर हा युवा फलंदाज जेम्स अँडरसनसारख्या कसलेल्या गोलंदाजांविरुद्ध मात्र झगडला होता. शिवाय, अगदी आयपीएल स्पर्धेतही सातत्याने त्याची भंबेरी उडाली होती. सध्या मयांक अगरवाल हा भक्कम पर्यायही भारतीय संघव्यवस्थापनासमोर आहे. त्यामुळे, रोहितसमवेत मयांकला पसंती मिळाली तर शुभमनला राखीव खेळाडूत बसावे लागेल.
कसोटीचा स्पेशालिस्ट चेतेश्वर पुजारा ः ऑस्ट्रेलियाविरुद्ध देदीप्यमान मालिकाविजय संपादन करुन देण्यात तिसऱया स्थानी फलंदाजीला उतरणाऱया चेतेश्वर पुजाराने मोलाचा वाटा उचलला होता. कमिन्स व हॅझलवूड यांच्याविरुद्ध तो अगदी भक्कम तटबंदीसारखा समोर उभा राहिला. त्या मालिकेत पुजाराने 3 अर्धशतकांसह 271 धावा फटकावल्या. ऑस्ट्रेलियाविरुद्ध जानेवारी 2019 मध्ये एससीजीवर त्याने 193 धावांची आतषबाजी केल्यानंतर त्याला एकही शतक झळकावता आलेले नाही. अगदी इंग्लंडविरुद्ध मायदेशातील मालिकेत तो अपयशी ठरला. आता न्यूझीलंडविरुद्ध त्या अपयशाची भरपाई करण्याची अपेक्षा त्याच्याकडून असेल. यापूर्वी, एजिस बॉल, साऊदम्प्टन येथे खेळलेल्या शेवटच्या कसोटीत त्याने 132 धावांची खेळी साकारली होती.
विराट ः शतकांचा दुष्काळ संपुष्टात येणार? ः जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमधील प्रवास विराट कोहलीसाठी बराच चढउताराचा ठरत आला आहे. पहिल्या सत्रात विराटने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कारकिर्दीतील सर्वोत्तम 254 धावांची धडाकेबाज खेळी साकारली. शिवाय, नोव्हेंबरमध्ये बांगलादेशविरुद्ध गुलाबी चेंडूवरील कसोटीत शतक झळकावणारा तो पहिला भारतीय फलंदाज ठरला. त्यानंतर मात्र त्याच्या धावांना अचानक ओहोटी लागली.
बांगलादेशविरुद्ध मालिकेनंतर विराटला 12 डावात केवळ 288 धावा जमवता आल्या असून यात केवळ 3 अर्धशतके समाविष्ट आहेत. नोव्हेंबर 2019 नंतर विराटला कोणत्याही क्रिकेट प्रकारात शतक झळकावता आलेले नाही. शतकांचा हा दुष्काळ त्याने न्यूझीलंडविरुद्ध संपुष्टात आणावा, ही भारतीय चाहत्यांची अपेक्षा असेल.
रहाणेचा फॉर्म महत्त्वाचा ः या मुंबईकर फलंदाजाने जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये 28 डावात 43.80 ची सरासरी व 3 शतकांसह 1095 धावांचे योगदान दिले आहे. मात्र, मागील 10 कसोटी सामन्यातील त्याचा फॉर्म निव्वळ निराशाजनक ठरला आहे. शेवटच्या 18 डावात रहाणेला 27.70 च्या सरासरीने व 1 शतक व 1 अर्धशतकासह केवळ 471 धावा जमवता आल्या आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्ध एमसीजीवरील धुवांधार शतक व इंग्लंडविरुद्ध चेन्नईच्या कठीण खेळपट्टीवरील त्याचे झुंजार अर्धशतक मात्र लक्षवेधी ठरले आहे. इंग्लंडविरुद्ध मायदेशात सीम-स्विंग तसेच स्पिन गोलंदाजीवर तो अपयशी ठरला होता. एजिस बॉल स्टेडियमवर त्याने 4 डावात तो अपेक्षापूर्ती करु शकलेला नाही. याची भरपाई करण्याची त्याच्याकडून अपेक्षा असेल.
पंतला बहर जागतिक चॅम्पियनशिपमध्येच! ः रिषभ पंतच्या फलंदाजीला या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्येच खरा बहर आला आहे, असे म्हटले तर अजिबात गैर ठरु नये. या स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात साहाकडे यष्टीरक्षणाची धुरा गेल्यानंतर पंत वास्तविक संघाबाहेर होता. पण, नंतर तो अचानक मुसंडी मारुन वर आला. सिडनी कसोटीत चौथ्या डावात 97 धावांची धुवांधार खेळी आणि गब्बावर भारत 328 धावांचा पाठलाग करत असताना त्याची 89 धावांची नाबाद खेळी विशेष लक्षवेधी ठरली होती. पंत इथेच थांबला नाही. त्याने पुढे घरच्या मैदानावर इंग्लंड संघाला देखील चांगलेच जेरीस आणले. दोन-एक अर्धशतके झळकावल्यानंतर अहमदाबाद कसोटीत त्याने मालिका जिंकून देणारे तडफदार शतक साकारले.
रविंद्र जडेजाकडून धमाका अपेक्षित ः जानेवारीत सिडनीत फलंदाजी करत असताना बोट प्रॅक्चर झाल्यामुळे ऑस्ट्रेलिया व इंग्लंडविरुद्ध बहुतांशी सामन्यात खेळण्याची संधी न मिळालेला जडेजा आता पूर्ण तंदुरुस्त आहे. मागील 2-3 वर्षात त्याने विशेषतः कसोटी क्रिकेटमध्ये आपले अष्टपैलूत्व प्रामुख्याने सिद्ध केले आहे. 2018 च्या प्रारंभापासून त्याने 16 कसोटीत 55.57 च्या सरासरीने 778 धावा केल्या आहेत आणि 26.07 च्या सरासरीने 55 बळी घेतले आहेत. सौराष्ट्राचा हा अष्टपैलू न्यूझीलंडविरुद्धही धमाकेदार खेळ साकारेल, अशी संघाला अपेक्षा आहे.
अश्विन सिडनीची पुनरावृत्ती करणार का? ः डब्ल्यूटीसी फायनल लढतीदरम्यान साऊदम्प्टनमधील वातावरण ओव्हरकास्ट किंवा सीम प्रेंडली नसेल तर भारतीय संघ जडेजा व अश्विन असे दोन फिरकी अष्टपैलू खेळवेल. अश्विनने इंग्लंड व ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेत एकत्रित 7 सामन्यात 18.56 च्या सरासरीने 44 बळी घेतले आहेत. यात डावात 5 बळी घेण्याचा पराक्रम त्याने 5 वेळा गाजवला आहे.
सिडनीमध्ये त्याने हनुमा विहारीसह सामना वाचवून देणारी खेळी साकारत भारतीय चाहत्यांची मने जिंकली होती. शिवाय, इंग्लंडविरुद्ध घरच्या मैदानावर 5 वे शतकही झळकावले आहे. अश्विनला साऊदम्प्टनमध्ये मात्र झगडावे लागले असून 2 डावात त्याला 41.33 च्या सरासरीने 3 बळीच घेता आले आहेत.
इशांत बहरण्याची आवश्यकता ः या उंचापुऱया गोलंदाजाने मागील 3 वर्षात उत्तम मारा साकारला असून न्यूझीलंडविरुद्ध अंतिम लढतीत भारताच्या जलद गोलंदाजीच्या नेतृत्वाची धुरा त्याच्याकडेच असू शकते. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये इशांत व शमी यांनी सातत्याने भेदक गोलंदाजी साकारली आहे. इशांतने 20 डावात 36 बळी घेतले असून तीनवेळा डावात 5 फलंदाज बाद केले आहेत. 2018 मध्ये साऊदम्प्टनवर इशांतने 97 धावात 4 बळी अशी लक्षवेधी गोलंदाजी साकारली. त्यामुळे, त्याच्याकडून संघाला विशेष अपेक्षा असतील.
शमीला पसंती मिळणार का? ः जडेजाप्रमाणेच मोहम्मद शमी देखील बरेच कसोटी सामने खेळू शकलेला नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऍडलेडमधील पहिल्या कसोटीत शमीला पॅट कमिन्सचा बंपर खांद्यावर आदळल्यानंतर संघातून बाहेर व्हावे लागले होते. नंतर अगदी इंग्लंडविरुद्ध मालिकेतही त्याला खेळता आले नाही. डब्ल्यूटीसीचे 7 सामने खेळता आले नसले तरी उर्वरित 10 सामन्यात त्याने 36 बळी घेतले आहेत. अर्थात, शमीचे इंग्लंडमधील रेकॉर्ड खराब आहे आणि त्याच्या गैरहजेरीत सिराजने इंग्लंडमध्ये उत्तम मारा केला होता. त्यामुळे, न्यूझीलंडविरुद्ध फायनलमध्ये संघव्यवस्थापन सिराजला पसंती देणार की, शमीला हे पाहणे औत्सुक्याचे असेल.
बुमराहकडून ऑस्ट्रेलियातील कामगिरीची पुनरावृत्ती अपेक्षित ः भारताची कोणतीच जलद गोलंदाजी आघाडी जसप्रित बुमराहशिवाय पूर्ण होऊ शकणार नाही. बुमराह इंग्लंडमधील खेळपट्टय़ांचे स्वरुप पाहता, तेथे फारशी लक्षवेधी कामगिरी करु शकला नव्हता. पण, ऑस्ट्रेलियात इशांत व शमीच्या गैरहजेरीत आक्रमणाची धुरा स्वीकारत त्याने तिखट मारा साकारला होता. डब्ल्यूटीसीमध्ये त्याने 17 डावात 22.41 च्या सरासरीने 34 बळी घेतले असून 2 वेळा डावात 5 बळी घेतले आहेत. शिवाय, यात एका हॅट्ट्रिकचा देखील समावेश आहे. साऊदम्प्टनमधील मागील लढतीत त्याने 4 बळी घेतले होते. आताही त्याच्याकडून संघाला भेदक माऱयाची अपेक्षा आहे.