खेड पोलिसांची दोन पथके मुंबईत तळ ठोकून, सीसीटीव्ही फुटेजचा घेणार आधार
प्रतिनिधी/ खेड
स्वस्त किंमतीत दोन किलो सोने देण्याचे आमीष दाखवत खरेदीसाठी गेलेल्या चौघांना 60 लाखाच्या रोकड लुटीतील मुख्य सूत्रधार व अन्य चार फरारींच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलीस पथकांनी मुंबईत ‘फिल्डींग’ लावली आहे. पनवेलपासून मुंबईपर्यंत सीसीटीव्ही फुटेजद्वारे फरारींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी सापळा रचला आहे. लवकरच सर्वांना गजाआड करण्याचा विश्वास पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांनी व्यक्त केला आहे.
60 लाखाच्या लूटप्रकरणी पोलिसांनी विक्रम वसंत चव्हाण, सिद्धेश विठ्ठल पवार, नरेश वसंत चव्हाण, विजय गौरीशंकर भगत, प्रमोद उर्फ बबल्या रामचंद्र चव्हाण, दीपक माणिक चव्हाण, अंकुश पंढरीनाथ पवार, मनोज जाधव यांना अटक केली आहे. जेरबंद टोळीकडून पोलिसांनी 2 लाखाच्या रोकडसह अल्टोकार 5 दुचाकी, 8 मोबाईल जप्त केले आहेत. लुटीतील मोठा भाग टोळीचा सूत्रधार किशोर पवार याच्याकडेच आहे. या सूत्रधारासह अन्य फरारींच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलीस उपविभागीय अधिकारी प्रवीण पाटील, पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांच्या नेतृत्वाखालील दोन पोलीस पथकांनी मुंबई येथेच तळ ठोकला आहे. मुख्य सूत्रधार किशोर पवार मूळचा दापोली तालुक्यातील हर्णे येथील आहे. स्थानिक पोलिसांच्या मदतीने पोलिसांनी हर्णे येथेही विशेष लक्ष ठेवले आहे.
लूटप्रकरणी रायगड जिल्हय़ातील म्हसळा येथे जेरबंद केलेल्या 5 जणांच्या टोळीने दिलेल्या माहितीनुसार मुख्य सूत्रधारासह अन्य फरारी पनवेलपर्यंत त्यांच्या सोबतच होते. त्यानंतर ते कुठे गेले याबाबत काहीच माहिती नसल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी फरारींना पकडण्यासाठी मुंबईतील सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेत तपासाला गती दिली आहे. पोलिसांची दोन पथके यासाठी जंगजंग पछाडत आहेत.
लुटीतील उर्वरित 58 लाखाची रोकड मुख्य सूत्रधाराकडेच असल्याने सर्वप्रथम त्याला गजाआड करण्यासाठी पोलिसांनी सापळा रचला आहे. मुख्य सूत्रधार किशोर पवार याचा 8 वर्षापूर्वी जयगड येथे झालेल्या स्फोटातही सहभाग होता, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली. सुरूवातीला गवंडी काम करणारा किशोर पवार ठेकेदारही असून हर्णे परिसरात त्याची 1 कोटीहून अधिक खर्चाची कामेदेखील सुरू असल्याची माहिती पुढे आली आहे.
झटपट पैसे कमावण्याच्या हव्यासापोटी स्वस्त किंमतीत दागिन्यांचे आमिष दाखवत 60 लाखाच्या रोकड लुटीचा प्लॅन रचला गेला. विश्वास संपादन करण्यासाठी सुरूवातीला काही ग्रॅम सोने दिले. येथील सुवर्णकाराने हे सोने वितळवून खात्री पटवली. यानंतरच चौघांनी सोने खरेदीचा व्यवहार निश्चित केल्याची माहिती पुढे आली आहे. सोने खरेदीच्या व्यवहारासाठी जुळवाजुळव करण्यात आलेल्या रकमेतही अनेकजणांनी गुंतवणूक केल्याची चर्चा आहे.