राजीनामा देण्याची काँग्रेसची मागणी,दोन दिवसांत तोडगा काढा, अन्यथा कचरा मंत्र्यांच्या घरासमोर
वास्को : सरकार आणि त्यांचे नगरविकासमंत्री मुरगाव पालिकेच्या कामगारांच्या वेतनप्रश्नी जबाबदारी झटकू शकत नाहीत. पालिका ही स्थानिक स्वराज्य संस्था असली तरी सध्या पालिकांचा ताबा पूर्णपणे सरकारकडे आहे. मुरगाव पालिकेचा पेचप्रसंग हे नगरविकास खात्याचे अपयश आहे. येत्या दोन दिवसांत मुरगावची गलिच्छता दूर झाली नाही तर पालिका क्षेत्रातील लोक एकत्र येऊन घराघरातील कचरा नगरविकासमंत्र्यांच्या घरासमोर टाकतील असा ईशारा गोवा प्रदेश काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष संकल्प आमोणकर यांनी दिला आहे.
मुरगाव पालिका कामगार वेतनाच्या मागणीसाठी गेले पाच दिवस संपावर आहेत. त्यामुळे पालिका क्षेत्रात पसरलेली गलिच्छता आणि लोकांची खोळंबलेली पालिकेतील कामे व पालिका प्रशासनाला कामगारांचा प्रश्न सोडवण्यासठी आलेले अपयश यासंबंधी काँग्रेसचे उपाध्यक्ष संकल्प आमोणकर यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुरगाव पालिकेच्या पेचप्रसंगाला सरकारला व नगरविकासमंत्री मिलिंद नाईक यानाच सर्वस्वी जबाबदार धरले. मुरगावची परिस्थिती हाताळण्यास पालिका प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरल्याचे आमोणकर म्हणाले. पालिका कामगारांच्या वेतनाचा प्रश्न त्वरीत सोडवावा व जनतेलाही या त्रासातून मुक्त करावे अशी मागणी आमोणकर यांनी केली. नगरविकासमंत्र्यांना पालिकेचा व्यवहार हाताळण्यास जमत नसल्यास त्यांनी राजीनामा देणेच योग्य असल्याचे ते म्हणाले.
सरकार व नगरविकासमंत्र्यांचा जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न
पालिका ही स्वतंत्र संस्था आहे. त्यांनीच कामगारांचा प्रश्न सोडवायला हवा हे नगरविकासमंत्री मिलिंद नाईक यांनी केलेले विधान हास्यास्पद व बेजबाबदारपणाचे असून पालिका ही स्वतंत्र संस्था असली तरी या संस्था सध्या सरकारच्या ताब्यात आहेत. सरकार नियुक्त प्रशासक पालिका चालवत आहेत याची जाणीव नगरविकासमंत्र्यांना नाही काय असा प्रश्न आमोणकर यांनी केला. महसुल गोळा करून कामगारांचे वेतन फेडणे हे प्रशासनाचे कर्तव्य आहे. सरकार व त्यांचे नगरविकासमंत्री जबाबदारी झटकू पाहात आहेत. आज मुरगाव पालिका क्षेत्र कचऱयांच्या पसाऱयांनी भरलेले आहे. सर्वत्र गलिच्छता वाढलेली आहे. स्थानिक जनतेचे गलिच्छतेमुळे हाल होऊ लागले आहेत. हा नगरविकासमंत्र्यांच्या अकार्यक्षमतेचाच परीणाम आहे. मुरगावात ऐवढा पेचप्रसंग निर्माण झालेला असला तरी त्यांना काहीच पडून गेलेले नाही. त्यांनी कामगारांची विचारपुसही केलेली नाही. मत्री मिलिंद नाईक एकेकाळी मुरगावचे नगरसेवक होते. निदान या आपल्या पालिका क्षेत्रावर तरी त्यांनी नियंत्रण ठेवायला हवे होते. सतत उपस्थित होणारा कामगारांच्या वेतनाचा प्रश्न सोडवायला हवा होता. ऐरव्ही या ना त्या कारणाने पालिकेच्या व्यवहारात सतत हस्तक्षेप करणाऱया मंत्री नाईक यांच्यासह या पालिका क्षेत्रात येणाऱया त्यांच्या आमदार कार्लुस आल्मेदा आणि मंत्री माविन गुदिन्हो यांनाही कामगारांच्या प्रश्नाचे सोयरसुतक नाही आणि या आमदारांमध्ये एकवाक्यताही नाही.
अन्यथा घराघरातील कचरा मंत्र्यांच्या घरासमोर
मुरगाव पालिका कामगार स्वतःच्या वेतनासाठी आणि हक्कांसाठी संपावर गेलेले आहेत. परीसरातील घाण दूर करणारे हे गरीब लोक आहेत. त्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडवायला हवेत. रस्ते साफ करण्याची सेवा करणारे मंत्री आणि त्यांचे कार्यकर्ते आता कचरा का उचलत नाहीत असा प्रश्न आमोणकर यांनी केला. प्रशासनाच्या अपयशामुळे निर्माण झालेली गलिच्छता लोकांनी किती दिवस सहन करावी असा प्रश्न करून येत्या दोन दिवसांत या प्रश्नावर तोडगा काढून गलिच्छता दूर न केल्यास पंचवीसही प्रभागातील लोक आपल्या घरातील कचरा नगरविकासमंत्र्याच्या घरासमोर आणून टाकतील असा ईशारा संकल्प आमोणकर यांनी यावेळी दिला. सरकारला जर पालिका चालवणे जमत नसल्यास पालिकेचेही खासगीकरण करा असा सल्लाही आमोणकर यांनी सरकारला दिला. या पत्रकार परिषदेत शंकर पोळजी यांनीही मुरगाव पालिका क्षेत्रात गलिच्छता माजवल्याप्रकरणी नगरविकासमंत्री मिलिंद नाईक यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली. यावेळी काँग्रेसचे गट अध्यक्ष महेश नाईक तसेच जयेश शेटगावकर उपस्थित होते.