प्रा. मायाप्पा पाटील यांचे आवाहन : व्याख्यानात दिले अनेक महापुरुषांच्या कर्तृत्वाचे दाखले
प्रतिनिधी/ बेळगाव
पुस्तके कधीही घात करत नसतात. त्यामुळे पुस्तक वाचणारी माणसे निर्भय असतात. म्हणूनच मुलांना पुस्तके वाचण्याची सवय लावायला हवी आणि तत्पूर्वी पालक आणि शिक्षकांनी पुस्तके वाचली पाहिजेत, असे मत बी. के. कॉलेजचे प्रा. मायाप्पा पाटील यांनी व्यक्त केले.
कडोली संमेलनाच्या दुसऱया सत्रात ते बोलत होते. या सत्राचे नियोजित वक्ते इंद्रजित देशमुख हे काही कारणास्तव संमेलनाला येऊ शकले नाहीत. त्यामुळे दुसऱया सत्रात ‘आई-बाबा आणि पुस्तके’ या विषयावर मायाप्पा पाटील बोलत होते.
ते म्हणाले, शेक्सपियरने अनेक नाटके लिहिली. परंतु, त्याच्या सर्व नाटकांचा सारांश तुकाराम चार ओळीत लिहू शकतात. सुरेश खाडे नावाचा तरुण ऐपत नसताना शिक्षण घेऊन ज्या शेतात आई राबली ती शेती खरेदी करतो. कारण त्याला आईच्या घामाची किंमत होती. अलोककुमारसारखा एक अवलिया आयआयटीची नोकरी सोडून एक लाख झाडे लावतो. कारण पुस्तक वाचनाने त्याचे मतपरितर्वन होते.
रेल्वेमध्ये चाळीस पानाचे पुस्तक वाचून एक तरुण अस्वस्थ होतो आणि आमुलाग्र बदलतो तो तरुण म्हणजे महात्मा गांधी होय. ज्यांना गांधी, आंबेडकर व्हायचे आहे, त्यांनी पुस्तके वाचलीच पाहिजेत. कारागृहात अगणित पुस्तके वाचूनही फाशीसाठी पाच मिनिटे द्या, माझे पुस्तक वाचून व्हायचे आहे, असे भगतसिंग म्हणतो. याचे कारण पुस्तकामुळे आलेली निर्भयताच होय.
पुस्तक भिजले म्हणून शिक्षेपोटी मित्राच्या घरी घरगडी राहणारे अब्राहम लिंकन पुढे राष्ट्रपती होतात. मार्क झुकेरबर्ग, बिल गेट्स तुफान वाचतात. सुंदर पिचाई म्हणतात, वेगवेगळय़ा कल्पना सुचण्यासाठी वाचन आवश्यक आहे. पन्नास हजार पुस्तकांमध्ये स्वतःला गाडून घेतो तो समाधानी आहे, असे माजी राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम म्हणतात. ज्यांच्या घरी पुस्तकांचे कपाट नाही, ते घर भुईसपाट होईल, हा इशारा समजून घ्या, असेही पाटील म्हणाले.
डॉ. माशेलकर, सुधा मूर्ती, नागराज मंजुळे अशा अनेकांची उदाहरणे प्रा. पाटील यांनी दिली. एक पुस्तक, एक पेन आणि एक शिक्षक जग बदलू शकते. म्हणूनच पुस्तके वाचा. या वाचनातून सामाजिक भूकंपांवरती चर्चा करण्याची कुवत वाढवा, असे आवाहनही त्यांनी केले.