प्रतिनिधी/ फोंडा
केवळ पुस्तकी अभ्यासावर भर न देता मुलांमधील गुणकौशल्यांना वाव देणारे शिक्षण आवश्यक असून त्यात देशी भाषांना प्राधान्य हवे. शिवाय नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करताना तशा साधनसुविधाही उपलब्ध करुन देणे गरजेचे आहे, असे मत शिक्षणतज्ञ तथा शिक्षणखात्याचे माजी संचालक कालीदास मराठे यांनी व्यक्त केले.
मराठी राजभाषा समितीतर्फे सहाव्या वर्धापनदिनानिमित्त नवीन राष्ट्रीय शैक्षणीक धोरण 2020 या विषयावर आयोजित केलेल्या चर्चा सत्रात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. खडपाबांध-फोंडा येथील विश्वहिंदू परिषद सभागृहात मंगळवारी सायंकाळी हे चर्चासत्र झाले. अध्यक्षस्थानी समितीचे अध्यक्ष गो. रा. ढवळीकर तसेच समितीचे पदाधिकारी दिवाकर शिंपे, राजराम जोग व प्रा. कृष्णाजी कुलकर्णी हे व्यासपीठावर उपस्थित होते.
आजच्या शिक्षण व्यवस्थेवर बोलताना कालिदास मराठे म्हणाले, आज अंगणवाडी ते केजी पर्यंतच्या शिक्षणात गोंधळाची अवस्था आहे. वयवर्षे 3 ते 6 वयोगटातील शिक्षण महागडे झाले असून मुलांच्या आकलन शक्तीला ते पेलणारे नाही. विद्यार्थ्यांमधील गुणकौशल्यांना वाव देणारे स्वतंत्र व स्वायत्त पायाभूत शिक्षण देणे काळाची गरज आहे. नवीन शैक्षणीक धोरणात त्यासंबंधी तरतुद करण्यात आली आहे. मात्र त्यासाठी शाळा, विद्यालयांना तशा साधनसुविधा उपलब्ध करुन द्याव्या लागतील. प्राथमिक शिक्षणावर भर देताना मुलांच्या पालकांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित कराव्या लागतील. प्राथमिक शिक्षणात आता इयत्ता पाचवीचा समावेश होणार असल्याने सहावी ते बारावीपयंतच्या दुसरया टप्प्यात व्यावसायिक शिक्षणावर भर दिला जाणार आहे. त्यामुळे मुलांच्या आकलनानुसार त्यांना त्यांच्या बुद्धीमत्तेला व सुप्त कलागुणांना वाव मिळणार आहे.
नवीन शैक्षणीक धोरणाचा अवलंब करताना निर्धारीत करण्यात येणाऱया समित्या केवळ कागदावर न राहता प्रत्यक्षात त्यांच्यात सुसंवाद होणे अपेक्षीत आहे. ग्रामशिक्षण समिती, बालहक्क समिती व पालक-शिक्षक संघात सुसंवाद हवा. मुळात भारतीय भाषांना प्राधान्य देणारे शिक्षण मुलांना मिळायला हवे. भारतीय भाषांना प्राधान्य देण्याचे कस्तुरीरंगन आयोगाने स्पष्ट केल्याने खऱया अर्थाने शिक्षणाला चालना देण्याचे काम झाले आहे. आज नवीन शैक्षणीक धोरणाचा अवलंब करताना आवश्यक साधन सुविधाही उपलब्ध व्हायला हव्यात, असे त्यांनी नमूद केले.
स्वागत व प्रासताविक कृष्णाजी कुलकर्णी यांनी केले. शिल्पा ढवळीकर यांनी प्रमुख वक्त्यांचा परिचय करुन दिला. मच्छिंद्र च्यारी यांनी सूत्रसंचालन तर गो. रा. ढवळीकर यांनी आभार मानले. या चर्चा सत्रात विविध शाळा, विद्यालयातील मुख्याध्यापक व शिक्षकांनी भाग घेऊन आपले विचार मांडले.