महिला बालकल्याण रक्षण आयोगातर्फे जनसंवाद कार्यक्रम
प्रतिनिधी / बेळगाव
पूर्वीच्या काळात महिलांचे विश्व हे फक्त घरापुरते मर्यादित होते. मात्र आता घटनेनुसार महिलांना सर्व क्षेत्रात समान संधी देण्यात आली आहे. मुलांवर बालपणापासून चांगले संस्कार झाल्यास मुले भविष्यात वाईट मार्गाला लागणार नाहीत. त्यासाठी योग्य वेळेतच मुलांवर चांगले संस्कार व मार्गदर्शन झाले पाहिजे. बालमजुरी ही कायद्याने गुन्हा आहे. तरीदेखील आज बालमजूर काम करताना दिसतात, ही शोकांतिका आहे, असे विचार जिल्हासत्र न्यायाधीश आर. जे. सतीश सिंग यांनी काढले.
महिला व बालकल्याण रक्षण विभाग, जिल्हा कायदा सेवा प्राधिकार आणि विविध विभागाच्यावतीने बुधवारी जिल्हा पंचायत सभागृहात बालकांचे लैंगिक शोषण आणि बालसंरक्षण याविषयी जनसंवाद कार्यक्रम पार पडला. यावेळी ते उद्घाटन करून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जि. पं. सीईओ राजेंद्र के. व्ही, जिल्हा कायदा सेवा प्राधिकरणाच्या सदस्या विजया असरू, डॉ. अशोक डिसोजा, बालकल्याण खात्याचे उपनिर्देशक बसवराज वरवट्टी, बी. एल. पाटील, कामगार खात्याचे सहाय्यक आयुक्त डी. जी. नागेश, बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा सिस्टर लुधया मेरी, भारती मळेकर आदी उपस्थित होते.
प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रोपटय़ाला पाणी घालून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. उपस्थितांचे पुष्प व ग्रंथ देऊन स्वागत करण्यात आले.
समाजात समाजसेवकांनी बदल घडवून आणला असला तरी अजूनही बराचसा समाज द्रारीदय़ रेषेखाली जगतो आहे. प्रत्येक समाजातून जागरूक नागरिक तयार होणे गरजेचे असल्याचे जि. पं. सीईओ राजेंद्र के. व्ही. यांनी सांगितले. यावेळी महिला बालहक्क रक्षण आयोगाचे अध्यक्ष डॉ. अंतोनी सेबास्टियन यांनी सभागृहात बालतस्करी आणि बालहक्क याविषयी लोकांच्या तक्रारी ऐकूण घेतल्या. याप्रसंगी व्ही. एस. सुशिला, विविध खात्याचे अधिकारी, पोलीस, आशा कार्यकर्त्या, नागरिक, विद्यार्थी उपस्थित होते..