प्रत्युषा बॅनर्जी हे नाव आपल्या परिचयाचं आहे. टीव्हीवर गाजलेल्या ‘बालिका वधू’ या मालिकेत तिनं ‘आनंदी’ ची भूमिका साकारली होती. या भूमिकेनंच तिला जनमानसात मोठं स्थान मिळवून दिलं. तथापि, तिनं 2016 मध्ये तिनं आत्महत्या केली, असं वृत्त प्रसारित झालं आणि संपूर्ण अभिनय क्षेत्राला धक्काच बसला. तिच्या आईवडिलांचा, तिनं आत्महत्या केली असेल, यावर आजही विश्वास नाही. त्यांच्या म्हणण्यानुसार तिचा मित्र, राहुल राज यानंच तिला आत्महत्या करायला प्रवृत्त केलं. त्यांनी पोलिसात तशी तक्रारही सादर केली आहे.
तथापि, दिवंगत मुलीला न्याय मिळवून देताना गेल्या पाच वर्षांमध्ये त्यांना त्यांच्या सर्वस्वावर जवळपास पाणी सोडावं लागलं आहे. त्यांच्याकडं असणारी रोख रक्कम, घर व इतर मालमत्ता त्यांना खर्च करावी लागली आहे. आता ते दोघंही एक बेडरुमच्या भाडय़ाच्या घरात रहात आहेत. शिवाय कर्जाचं ओझं शिरावर आहेच. प्रत्युषा हाच त्यांचा एकमेव आधार होती. ती भरात होती तेव्हा तेही समाधानाच्या शिखरावर होते. पण तिच्या जाण्यानं त्यांच्यावर आकाश कोसळलं आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार ते न्यायासाठी झगडत आहेत.
राहुल राज यानं सगळे आरोप फेटाळले आहेत. त्याच्या म्हणण्यानुसार प्रत्युषाचे मातापिताच तिच्या आत्महत्येला उत्तरदायी आहेत. त्यांना अधिक पैशाची हाव सुटली होती. त्यापोटी तिनं आत्महत्या केली. खरं काय ते न्यायालयात जेव्हा प्रकरणाची तड लागेल तेव्हाच समजेल. पण न्यायास विलंब म्हणजे न्यायास नकार, या म्हणीचा प्रत्यय या प्रकरणात येत आहे. या प्रकरणाची चौकशी लवकर झाली असती तर तिच्या मातापित्यांवर अशा प्रकारे निराश होण्याची वेळ आली नसती.