वार्ताहर / व्हनाळी
तळागाळातील माणसाची प्रगती व्हावी, त्यांचे दुःख दारिद्रय नष्ट व्हावे यासाठी गेल्या तीन दशकांपासून अविश्रांतपणे कार्यरत असणाऱ्या ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर झालेले आरोप हे अत्यंत दुर्दैवी आणि निषेधार्थ आहेत. हे आरोप अदखलपात्र असल्याची प्रतिक्रिया माजी आमदार संजयबाबा घाटगे यांनी दिली. तसेच,खचून न जाता अव्याहतपणे सुरू असणाऱ्या कार्यात ना.मुश्रीफ यांनी कार्यमग्न राहावे असे आवाहनही त्यांनी केले.
ना.हसन मुश्रीफ यांच्यावर चुकीच्या पद्धतीने झालेल्या आरोपाबाबत ते केनवडे(ता.कागल)येथिल अन्नपूर्णा कारखाना कार्यस्थळावर पत्रकारांशी बोलत होते.
अल्पसंख्याक समाजातील असतानाही ना. मुश्रीफ हे आपल्या कार्याच्या जोरावर लोकप्रियतेच्या शिखरावर पोहचले आहेत. परंतु,समाजामध्ये चांगले काम करणाऱ्या व्यक्तींचे चारित्र्यहनन करून त्याला समाजात मानसिकदृष्टया दुबळे करण्याचा हा आधुनिक फंडाच आहे. समाजातील दिनदलित,उपेक्षित, शेतकरी, कष्टकरी, दिव्यांग, निराधार व्यक्तीला आधार देण्यासाठी संवेदना कायम राखून काम करणारे नेते आहेत. त्यामुळे जनताही ना.मुश्रीफ यांच्या पाठिशी भक्कमपणे उभी असून लोकसेवेच्या जोरावरच त्यांनी सलग पाच वेळा विजय संपादन केला आहे. ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. त्यामुळे अशा लोकप्रिय लोकप्रतिनिधींवर नाहक आरोप करून त्यांच्या वाटेत अडथळा निर्माण करणे. ही लोकहिताला बाधा आणणारी बाब असल्याचेही श्री घाटगे यांनी सांगितले.
दरम्यान, जिल्ह्यातील लोकप्रिय नेतृत्व असणारे आमदार पी एन पाटील यांच्यावर झालेले आरोपही खेदजनक आहेत. त्यांची ही घरगुती बाब असल्यामुळे याबाबत आपण अधिक बोलणे उचित नसल्याचेही संजयबाबा घाटगे यांनी सांगितले.