उन्हाळा आला की आमच्या लहानपणी मोठय़ा अंगणामध्ये खाटा पडत. घरातले लोक नैसर्गिक हवेत रात्री बाहेर झोपत. मुलांची दंगा-मस्ती चाललेली असायची आणि अंधारातले ते गच्च चांदण्यांनी भरलेले आकाश निरखीत सारे निद्राधीन होत. पौर्णिमेचा पूर्ण चंद्र साऱयांना मोहवित असे. चंद्रावर हरिण आहे की ससा यावर काथ्याकूट होऊन शेवटी ते हरिणच आहे यावर शिक्कामोर्तब झाले की वनवासी असलेले हरिण पुराणातील गोष्टींच्या माध्यमातून मनोविश्वात स्थापन होत असे. एरवी हरिण प्रत्यक्ष बघायला मिळणे दुरापास्त होते. पुस्तकांमध्ये त्याचे चित्र तेवढे बघायला मिळायचे. निसर्गसाखळीमधला महत्त्वाचा दुवा असलेले हरिण आपल्या द्रष्टय़ा पूर्वजांनी अतिशय कल्पकतेने माणसाच्या रोजच्या जगण्यात आणून ठेवले. जंगली प्राण्यांचे आवडते भक्ष्य असलेले भित्रे हरिण अध्यात्म क्षेत्रात मोक्मयाच्या ठिकाणी निर्भयतेने वावरते आहे.
समर्थ रामदास स्वामींच्या पंचायतनातील श्री रंगनाथस्वामी निगडीकर यांचा पुतण्या खंडोबा हा हुशार होता, पण धीट नव्हता. एक दिवस निंदकांनी त्याची चेष्टा केली तेव्हा तो खिन्न झाला. त्यावेळी रंगनाथ स्वामी यांनी त्याच्या जिभेवर श्री हे अक्षर काढले आणि त्याचे श्रीधर हे नाव ठेवून त्याला बहुश्रुत केले. तेच पुढे श्रीधरस्वामी नाझरेकर म्हणून सर्वपरिचित झाले. श्रीधराने अमाप लोकप्रिय ग्रंथरचना केली. त्यातील शिवलीलामृत हा ग्रंथ आजही श्रद्धेने लोकांच्या मुखी आहे.
श्री शिवलीलामृतातील दुसरा अध्याय हा मृग परिवारावर आधारित आहे. शिवाची निंदा आणि चेष्टा करणारा एक व्याध शिकारीसाठी वनात गेला. बेलाच्या झाडावर जागा हेरून बसला आणि हेटाळणीच्या सुरात शिव शिव म्हणू लागला. रात्रीचा एक प्रहर उलटल्यावर पाणी प्यायला सरोवराकाठी एक गर्भिणी हरिणी आली. व्याधाने शरसंधान करताच ती मानवाप्रमाणे बोलू लागली… ‘माझा काहीही गुन्हा नसताना तू मला का बरे मारतोस? उदरात गर्भ असलेल्या प्राणी हत्येचे पाप मोठे आहे.’ तिची मनुष्यवाणी ऐकून व्याधाने तिचा पूर्वजन्म तिला विचारला तेव्हा ती म्हणाली, ‘पूर्वजन्मात मी चतुर रंभा होते. मद चढल्यामुळे मी उन्मत्त झाले आणि शिवभजन विसरले. हिरण्य नावाच्या राक्षसाबरोबर रमले तेव्हा शिवाने मला शाप दिला की तू मृत्युलोकी मृगी होशील. तुझ्या दोन्ही सख्याही हरिणी होतील आणि हिरण्य राक्षस मृग होऊन तुम्हाला रत होईल. यावर शिवाची आराधना करून मी उःशाप मागितला असता बारा वर्षे झाल्यावर मुक्त होऊन तुम्ही शिवपदाला प्राप्त व्हाल असा आशीर्वाद त्याने दिला’, एवढे सांगून ती हरिणी म्हणाली, ‘मी प्रसूत झाल्यावर तू सुखाने माझा प्राण घे.’ तेव्हा व्याध म्हणाला, तू खोटे कशावरून बोलत नाहीस? शपथ घे. तेव्हा तिने वेगवेगळे संदर्भ सांगून शपथ घेतली. त्यानंतर दुसरी तिसरी मृगी तिथे आली आणि त्यांनी व्याधाचे प्रबोधन करीत शपथ घेतली. शेवटी तिथे मृगराज जलपानार्थ आला. त्याने शिवमहिमा सांगून शपथ घेतली आणि सर्वांनी स्वतःचे प्राणरक्षण केले. नंतर सारा परिवार एकत्र आला आणि व्याधाचे अन्न व्हावे म्हणून आमचा सर्वप्रथम वध कर म्हणून व्याधाला विनवू लागला. व्याध सद्गदित होऊन म्हणाला, माझा जन्म सार्थकी लागला. तुमच्या मुखाने शिव निरूपण ऐकले. ‘बहुत जन्माचे पाप जळाले । पावन केले शरीर’। तुम्हीच आता माझे सर्वस्व आहात. तेवढय़ात तिथे शिवगण प्रकटले आणि सर्वांना दिव्य शरीर देऊन शिवलोकी घेऊन गेले. शिवलीलामृतकार म्हणतात, तारामंडळी मृगे राहती । अद्यापि गगनी झळकती । जन पाहती सर्व डोळा। मृग परिवाराने एका मनुष्यदेहाचा उद्धार केला.
प्राचीन काळी माणूस शिकार करून आपले पोट भरत असे. मानवाला मांसाहारापासून दूर करून वनस्पती आहाराकडे वळवण्यात ऋषीमुनींनी अतिशय परिश्रम केले. माणूस शेती करू लागला. परंतु पिके भरात आली की हरिणांचा कळप नासाडी करीत असे. शेतीसाठी केलेले कष्ट वाया गेलेले बघून माणूस पुन्हा मांसाहाराकडे वळेल अशी भीती वाटल्यामुळे निर्दोष हरिणांच्या शिकारीसाठी ऋषींनी परवानगी दिली. माणसाच्या विकासासाठी हरिणांचे बलिदान झाले ही गोष्ट ध्यानात घेऊन कृतज्ञता म्हणून मृगाजीन अर्थात हरणाचे कातडे पूजेसाठी देवस्थानात पवित्र मानले. एरवी कुठल्याही मंदिरात चामडय़ाच्या वस्तू चालत नाहीत. मात्र मृगाजीन चालते, असे पूज्य पांडुरंगशास्त्री आठवले म्हणतात. मृगाजिनाचा वेगळा अर्थ पूज्य शिरीषदादा कवडे यांनी सांगितला आहे. साधू-संन्यासी हे रानावनात तपश्चर्या करतात, फिरतात तेव्हा त्यांच्याजवळ मृगाजीन असते. कारण मृग मेल्यानंतर त्याच्या कातडय़ाचा गंध खूपच वेगाने बदलतो. जिवंत असताना त्याचा गंध पूर्णपणे वेगळा असतो. हिंस्त्र श्वापदांचे घ्राणेंद्रिय सूक्ष्म असते. त्यांना हा गंध पटकन जाणवतो आणि ते मेलेल्या जनावरापाशी फिरकत नाहीत. मृगाजीन हे साधू संन्यासी यांच्यासाठी संरक्षक-कवच ठरते. दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक प्राण्याचे विशिष्ट असे गुणधर्म असतात. जसे की कोल्हा लबाड, कुत्रा इमानदार, गाय सात्विक, तसेच हरिण चंचल मनाचे असते. मात्र त्या प्राण्याच्या गुणधर्माच्या विरुद्ध गुण त्याच्या कातडय़ामध्ये येतात. हरिण चंचल असले तरी मृगाजिनावर बसून साधना करणाऱया साधकाचे मन मात्र लवकर स्थिर होते. तंत्रशास्त्रात म्हटले आहे की ज्ञानप्राप्तीसाठी हरणाचे कातडे वापरावे. शाळीग्रामाचे अनेक प्रकार असतात. त्यातील नरसिंह शाळीग्राम हा गडद निळा रंगाचा असतो. उग्र असतो. म्हणून त्याला हरिणाचे कातडे लावलेल्या छोटय़ा पेटीमध्ये संपुष्ट ठेवतात. त्याचा कोप होऊ नये, तो स्थिर रहावा म्हणून असे करत असावेत.
श्रीसूक्तम् स्तोत्रामध्ये लक्ष्मीला हरिणी असे म्हटले आहे. हरिण हे चपळ, सुंदर आणि भित्रे असते. लक्ष्मी ज्या घरी जाते तिथे तिचे डोळे भिरभिरत असतात. ते स्थिर नसतात. तिला सतत भय वाटते की पैसा आल्यामुळे माझी मुलं नास्तिक तर तर होणार नाहीत? पैसा मिळाला की तो बारा वाटांनी लोभमोहापायी निघून जातो. लक्ष्मी ज्याच्या घरी जाते तो तिला स्थिर ठेवेल असं नाही. म्हणून ऋषी म्हणतात, लक्ष्मी तू हरिणी आहेस. तिच्या मुलांवर तिचा भरवसा नाही.
रामायणामध्ये हरिण या वन्यजीवाची भूमिका मध्यवर्ती आणि विशेष आहे. राजा दशरथाला पुत्र संततीसाठी पुत्रकामेष्टी यज्ञ करायचा होता. त्यासाठी विभांडक ऋषींची आवश्यकता होती. परंतु विभांडक ऋषी सहज प्राप्त होणारे नव्हते त्यांना मृगीपासून झालेला एक पुत्र होता. त्याचे नाव ऋष्यशृंग. तोही महातपस्वी होता. त्याला अप्सरांकरवी भुलवून राजा दशरथाने अयोध्येत आणले आणि त्याचा विवाह करुन दिला. पुत्राच्या शोधासाठी विभांडक ऋषी क्रोधाने अयोध्येत आले आणि विवाहाचा थाटमाट बघून आनंदित झाले. आणि पुत्रकामेष्टी यज्ञ सफल झाला. रामायणात रावणाकडून सीताहरण झाले कारण मारीचाने घेतलेल्या सुवर्णमृगाचे रूप होय. रामचरित मानस कार संत तुलसीदास म्हणतात, शिकार हा पुरुषांचा आवडता खेळ आहे. त्यामुळे मूळ मृगावर सर्वप्रथम दृष्टी क्षत्रिय पुरुषाची जाते. पण कांचनमृगावर सीतेची दृष्टी गेली कारण सीतेचे रूप त्यावेळी मायावी होते. खरी सीता अग्नीमध्ये गुप्त झाली होती. मायेची दृष्टी मायेवर गेली आणि सारे रामायण घडले. एका मृगाची अभिलाषा रामायणाचे प्रमुख कारण ठरले. श्रीराम रावणाचा वध करून विजयी झाले तेव्हा देवांचे थवे श्रीरामांचे अभिनंदन करायला आपापल्या वाहनांमधून निघाले. त्यात वायुदेव मृगावर बसून निघाले. समर्थ रामदास स्वामी म्हणतात, हनुमंताचा पिता वायु खुशीत होता कारण रामायणात त्याच्या पुत्राचा पराक्रम न भूतो न भविष्यती असा होता. निळा वर्ण तो वायू अंकुश पाणी । मृगारूढ होवोनिया नीळवर्णी । सुताच्या गुणे आवडीने निघाला ।
आद्य शंकराचार्य शिवाला मृगधरः असे म्हणतात. चंचल, विषयी मनाला त्यांनी ताब्यात ठेवले आहे म्हणून त्यांच्या हाताची मृगी मुद्रा दिसते आहे. श्री दत्तप्रभूंचा जन्म मृग नक्षत्रावर झाला. मैत्री आणि शुभ कर्मासाठी हे नक्षत्र प्रशस्त मानले गेले आहे. श्री दत्तप्रभूंनी हरिणाला गुरू केले कारण नादलुब्धतेमुळे हरिण पारध्याला अनायसे वश होते. वनातून घरी परतताना जर मृग उलटय़ा दिशेने पळू लागले तर तो अपशकुन असतो. मोठमोठय़ा डोळय़ांच्या युवतीला मृगनयनी असे म्हणतात. मृगाचा आभास हे श्रीकृष्णाच्या इहलोकीच्या अवतारसमाप्तीचे कारण झाले. श्रीकृष्णाच्या सुकुमार लालसर पावलांचा तळवा एका आदिवासी निषादाला हरिणाच्या मुखासारखा दिसला आणि त्याने बाणाने परमात्म्याच्या यात्रेचा शेवट केला. जंगलात वास्तव्याला असलेले हरिण कर्मधर्मसंयोगाने माणसाच्या दृष्टीस पडते खरे; मात्र अध्यात्मात रमलेल्या माणसाची दृष्टी ते बदलून टाकते हेही तेवढेच खरे.
सौ. स्नेहा शिनखेडे