अचूक बातमी “तरुण भारत”ची, शुक्रवार 20 ऑगस्ट 21, सकाळी 9.30
●माण तालुक्यातील 19 मृत्यूंनी धास्ती
●प्रशासनाचे तोंडावर बोट
●जिल्ह्यात नव्याने वाढले 597 रूग्ण
●11 हजार 633 संशयितांच्या चाचण्या
●पॉझिटिव्हीटी रेट पुन्हा 5 टक्क्यांवर
●जिल्ह्यातील 172 रूग्णांचे नमुने तपासणीला ‘एनआयव्ही’कडे
सातारा / प्रतिनिधी :
मोहरम, रक्षाबंधन यासह इतर सण सुरू असतानाच जिल्ह्यात कोरोना रूग्णवाढ कधी जास्त तर कधी अचानक कमी होत आहे. गेले दोन दिवस 5 टक्केंच्या खाली असणारा पॉझिटिव्हीटी रेट काहीसा वाढत पुन्हा 5.13 टक्क्यांवर आला आहे. यातच गुरूवारी दुपारी आलेल्या तालुकानिहाय कोरोना आकडेवारीत माण तालुक्यात तब्बल 19 रूग्णांचे मृत्यू झाल्याचे दिसत आहे. मृत्यूचा हा आकडा धक्कादायक असून हे मृत्यू 24 तासात झाले आहेत की जुन्या नोंदी केल्यानेे हा आकडा वाढला आहे हे कळायला मार्ग नाही. दरम्यान शुक्रवारी जिल्ह्यात नव्याने 597 रूग्णांची भर पडली आहे.
एकट्या माण तालुक्यात एवढे मृत्यू कसे?
गुरूवारी दुपारी जिल्ह्यातील कोरोना रूग्णवाढीचा अहवाल आला. त्यामधे जिल्ह्यात 36 कोरोना रूग्णांचा बळी गेला. त्यामधे 19 मृत्यू एकट्या माण तालुक्यात झाले आहेत. त्यामुळे माण तालुक्यात धास्ती वाढली आहे. अचानक वाढलेला हा आकडा 24 तासातीलच आहे की जुन्या रखडलेल्या नोंदी भरल्याने हा आकडा फुगला आहे हे समोर येणे गरजेचे आहे. वाई तालुक्यातही 7 रूग्णांचा मृत्यू झाला असून कराड तालुक्यात 6 मृत्यू झाला आहे.
रूग्णवाढीपेक्षा मृत्यूदर चिंतेत टाकणारा
जिल्ह्यात रूग्णवाढ कमी जास्त होत असली तरी कोरोनामुक्तीही त्याच प्रमाणात आहे. गेल्या 24 तासात 797 रूग्णांनी कोरोनावर मात केली असून 597 रूग्ण वाढले. मात्र मृत्यूदर 20 पेक्षा जास्त आहे. यातच गेल्या 24 तासात 36 रूग्णांचा मृत्यूू झाल्याने ही संख्या चिंतेत टाकणारी आहे. यातच माणसारख्या एकाच तालुक्यात 19 मृत्यू झाल्याने चिंतेत भरच पडली आहे.
कोल्हापुरात डेल्टाप्लसचे रूग्ण…सातारा अलर्ट
पुण्यानंतर आता शेजारच्या कोल्हापूर जिल्ह्यात डेल्टा प्लसचा रूग्ण सापडला आहे. त्यामुळे सातारा जिल्हा प्रशासन अलर्ट झाले आहे. या पार्श्वभुमीवर जिल्ह्यातील 172 कोरोना रूग्णांचे नमुने तपासणीसाठी पुण्याच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. या अहवालाची जिल्हा प्रशासनाला प्रतिक्षा असून अहवाल आल्यावर पुढील उपाययोजना करण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज आहे.
सणासुदीमुळे गर्दी वाढली
जिल्ह्यासह राज्यात उठलेला लॉकडाऊन आणि रात्री दहापर्यंत असलेली दुकानांची वेळ यामुळे जनजीवन पुर्वपदावर येत असल्याचे पहायला मिळत आहे. रविवारी रक्षाबंधन असल्याने बाजारपेठांमधे गर्दी वाढली आहे. गर्दी वाढत असली तरी सार्वजनिक ठिकाणी प्रत्येकानेच जबाबदारीचे भान ठेवून कोरोना नियमांचे पालन करण्याची गरज आहे. गेल्या वर्षी प्रत्येक सण अगदीच नियमांच्या चौकटीत साजरा करावा लागल्याने यंदा काहीसा उत्साह पहायला मिळत आहे.
गुरूवारी जिल्हय़ात
एकूण बाधित 597
एकूण मुक्त 797
एकूण बळी 36
गुरूवारपर्यंत जिल्हय़ात
एकूण नमूने -1633638
एकूण बाधित -233467
घरी सोडलेले – 219675
मृत्यू -5689
उपचारार्थ रुग्ण-10916