प्रतिनिधी / सातारा :
जिल्ह्यात 13 महिन्यात तब्बल 3031 जणांचे कोरोनाने बळी गेलेले आहेत. दररोज 40 हून अधिक जणांचे बळी जात आहेत. मृत्यूदर शुन्यावर आणण्यासाठी सातारचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी नवीन फंडा सुरु केला आहे. त्यामध्ये कोमॉर्बिड रुग्णाचे सर्व्हे, त्यांची चाचणी आणि त्यांच्यावर उपचार असा ट्रीपल टीचा कार्यक्रम सुरु करण्यात आला असून, त्याची पथके नियुक्त करण्यात आली आहेत. त्यामुळे आता प्रत्येक गावातील कोमॉर्बिड असलेल्या व्यक्तीचा सर्व्हे होणार असून त्यांच्या तपासण्या केल्या जाणार आहेत.
सातारा जिल्ह्याचा मृत्यूदर रोखण्यासाठी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी नव्याने ट्रेसिंग, टेस्टींग आणि ट्रीटमेंट ही कार्यपद्धती सुरु केली आहे. त्याबाबतच्या समित्या नियुक्त करुन त्यांच्यावर जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत.
जिल्ह्याचा मृत्यूदर 1.9 टक्के, देशाचा मृत्यूदर 1.09 टक्के, तर महाराष्ट्राचा मृत्यूदर 1.5 टक्के एवढा आहे. कोमॉर्बिड व्यक्तीमध्ये लागण झाल्यास मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे अशा व्यक्तींचा शोध घेवून त्यांची तपासणी करणे व लक्षणानुसार उपचार करणे आवश्यक बनले आहे. ग्रामीण भागात मृत्यूचे प्रमाण जास्त आहे. त्यासाठी ग्रामीण भागात कोमॉर्बिड रुग्णाचे सर्व्हेक्षण करण्यासाठी आणि त्यांची रॅपिड अँटीजेन टेस्ट करणे, पॉझिटीव्ह आढळून आलेल्यांवर उपचार करणे असा नियोजन बद्द कार्यक्रम करण्यात आला आहे.
त्यासाठी आशांकडे गाव पातळीवर कोमॉर्बिड रुग्णांचे सर्व्हेक्षण करुन दररोज किमान 25 रुग्णांना भेट देणे, त्यांच्यात लक्षण आढळून आल्यास ऑक्सीजनची पातळी 94 च्या खाली असल्यास गटप्रवर्तकांना माहिती देणे, गटप्रवर्तकांनी तालुका संघटककांना माहिती देणे, दररोज दोन ते तीन गावांना भेट देणे, तालुका संघटकांनी तालुका आरोग्य आधिकाऱ्यांना माहिती देणे, तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी संशयितांची रॅपिड टेस्ट करुन घेणे, बाधित आढळून आल्यास उपचाराची सुविधा उपलब्ध करुन देणे, रॅपिडमध्ये निगेटीव्ह आल्यास आणि लक्षणे असल्यास आरटीपीसीआर करणे, तसेच प्राथमिक वैद्यकीय केंद्रांना जबाबदाऱ्या दिल्या आहेत.