कोरोनाच्या उद्रेकात दहावीतील एका मुलाच्या पित्याचा दुःखद अंत झाला. पित्याच्या मृत्यूमुळे त्याला अनावर दुःख झाले. त्यातच कोणतरी त्याला सांगितले की गुरुपौर्णिमेच्या दिवशी पूजा केल्यास मृत पिता जिवंत होऊ शकेल. या सल्ल्याने तो इतका भारला गेला की त्याने कोणालाही न सांगता घरातून पलायन केले. त्याला शोधण्यासाठी त्याच्या कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार सादर केली. पोलिसांनी त्याला बऱयाच प्रयत्नानंतर उत्तराखंडमधील ऋषीकेश येथे ताब्यात घेतले.
हा विद्यार्थी दिल्लीच्या उत्तर भागातील कंझावाला या निवासी शाळेत शिकतो. तो तंत्रज्ञानाचा विद्यार्थी आहे. त्याने कोरोना काळापूर्वी ओमान येथे झालेल्या तंत्रज्ञान चर्चासत्रात भारताचे प्रतिनिधीत्वही केलेले आहे. ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात त्याच्या वडिलांचे कोरोनामुळे निधन झाले. 29 ऑक्टोबरला त्याने कोणालाही न सांगता घर सोडले. तो सायकल घेऊन घराबाहेर पडला होता.
त्याला ताब्यात घेतल्यानंतर चौकशीच्यावेळी त्याच्या या अध्यात्मिक प्रवासाचा खुलासा झाला. तो सापडला तेव्हा ऋषीकेश येथे एका मंदिरात त्याचा अध्यात्माचा अभ्यास सुरू होता. गुरू पौर्णिमेच्या दिवशी रहस्यमय अनुष्ठान केल्याने पिता जिवंत होऊ शकेल, असे त्याला सांगण्यात आले होते. आता त्याच्या सल्लागाराचीही चौकशी सुरू असून या प्रकरणाची चर्चा पंचक्रोशीत सुरू आहे.