आमदार नीतेश राणे यांची टीका : कोकणात 77 टक्के गुंतवणूक करण्याचे केले होते जाहीर!
चिपी प्रकल्पातील स्थानिकांना प्राधान्य न दिल्यास इतरांना नोकरी करू देणार नाही!
प्रतिनिधी / कणकवली:
राज्य शासनाने मॅग्नेटिक महाराष्ट्र अंतर्गत राज्यात करोडोची गुंतवणूक होणार असल्याचे जाहीर केले. यातील कोकणात 77 टक्के गुंतवणूक होणार असल्याचे सांगण्यात आले. प्रत्यक्षात या 77 टक्के गुंतवणुकीत सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्हय़ात एकही रुपयाची गुंतवणूक नाही. एकीकडे येणाऱया प्रकल्पांना विरोध, प्रकल्प आणण्यासाठी प्रयत्न नाही, गुंतवणुकीच्या माध्यमातून पैसा येत नाही, तर येथील तरुण-तरुणींनी काय करावे? सरकार रत्नागिरी, सिंधुदुर्गातील जनतेवर सूड उगवत असल्याचा आरोप करतानाच चिपी एअरपोर्टच्या माध्यमातून निर्माण होणाऱया नोकऱया जिल्हय़ातील लोकांनाच द्या. अन्यथा जिल्हय़ाबाहेरच्यांना येथे नोकऱया करू देणार नाही, असा इशारा आमदार नीतेश राणे यांनी दिला.
येथील प्रहार भवनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत राणे बोलत होते. मॅग्नेटिक महाराष्ट्र हा कार्यक्रम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी महाराष्ट्रात होणाऱया करोडोच्या गुंतवणुकीतील 77 टक्के गुंतवणूक कोकणात होणार, अशी माहिती देण्यात आली. ही आनंदाची बातमी असायला हवी होती. मात्र, या 77 टक्के गुंतवणुकीत सिंधुदुर्ग व रत्नागिरीत एक रुपयाचीही गुंतवणूक नाही. यातून कोकणात रायगड, ठाणे, पालघर, भिवंडी आदी ठिकाणी गुंतवणूक आहे. गेल्या एक वर्षात कोरोनाच्या आधी व नंतरही येथे प्रकल्प सुरू करण्यासाठी राज्य शासनाने प्रयत्न केलेला नाही. सी वर्ल्ड, आडाळीसाठी प्रयत्न नाही. नाणारला विरोध. नवीन एक रुपयाची गुंतवणूक नाही. आपला जिल्हा 2014 पर्यंत पहिल्या पाचमध्ये होता. त्याचे आता पुढे काय होणार? रोजगार नाही, नोकऱया नाहीत, आर्थिक समृद्धी कशी येणार? जिल्हय़ाची वाटचाल नेमकी कुठच्या दिशेने सुरू आहे, याबाबत पालकमंत्री, सत्तेतील लोकप्रतिनिधींनी भूमिका जाहीर करावी, अशी मागणी त्यांनी केली.
कोकण रायगडपर्यंतच का?
येथे गुंतवणुकीच्या माध्यमातून एक रुपयाही येत नाही. आडाळी येथील एमआयडीसीमध्ये मॅग्नेटिक महाराष्ट्र अंतर्गत गुंतवणूक का आणली नाही. येथील प्रत्येक प्रकल्पाला विरोध. शिवसेनेचे मुख्यमंत्री असताना रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्हा का वगळला गेला? कोकण केवळ रायगडपर्यंतच आहे का? कोरोनामुळे बेरोजगारी वाढली, नोकऱया गेल्या. चाकरमानी गावी आले. अशी स्थिती असताना राज्यकर्ते या जिल्हय़ांमध्ये गुंतवणूक आणण्यासाठी प्रयत्नशील का नाहीत? अशा पालकमंत्र्यांचा उपयोग काय? खासदार काय करताहेत? येथील तरुणांनी हातावर हात धरून बासयचे का? असा सवालही राणे यांनी केला.
नाणारबाबत राष्ट्रवादीची भूमिका काय?
राष्ट्रवादीने नाणारला समर्थनार्थ भूमिका वेळोवेळी जाहीर केली. मात्र, आता राष्ट्रवादीची नाणारबाबतची भूमिका काय आहे? हे स्पष्ट होण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. ठाकरे सरकार गेल्या वर्षभरापासून एकही रुपयाची गुंतवणूक न करता जिल्हय़ाला अधोगतीकडे नेत आहे. प्रत्येक विषयात जिल्हय़ावर अन्याय केला जात आहे. बार उघडले पण वॉटर स्पोर्टस्ला परवानगी नाही. कोकणवर होणारा अन्याय जनतेसमोर यावा, यासाठी आम्ही भूमिका स्पष्ट करत असल्याचे राणे म्हणाले.
एअरपोर्टच्या नोकऱया स्थनिकांनाच द्या!
चिपी एअरपोर्टशी निगडित असलेल्या नोकऱयांबाबत भूमिपूत्रांना माहिती का दिली जात नाही. त्याचे प्रशिक्षण भूमिपुत्रांना का नाही? एअरपोर्टच्या माध्यमातून ज्या नोकऱया उपलब्ध होणार आहेत, त्या जिल्हय़ातील लोकांनाच मिळायला हव्यात. जिल्हय़ाबाहेरच्यांना नोकऱया करू देणार नाही. प्रशिक्षणासाठी मार्गदर्शन, मदत आवश्यक असेल, तर आम्ही करतो. केंद्र शासनाच्या आशीर्वादाने होणाऱया या प्रकल्पाच्या नोकऱया जिल्हय़ातील लोकांनाच मिळायला हव्यात, असे राणे म्हणाले. 0