प्रतिनिधी / रत्नागिरी
रत्नागिरी तालुक्यातील मेर्वी परिसरात अनेक ग्रामस्थांवर हल्ला करणारा बिबट्या अखेर वनविभागाच्या पिंजऱ्यात जेरबंद झाला आहे. या बिबट्याने गेले काही दिवस या परिसरात दहशत माजवली होती. बिबट्याला पकडण्यासाठी लावलेल्या पिंजऱ्यातच बिबट्या फसला आहे. बिबट्या पकडला गेल्याने गावातील ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.
मेर्वी, पावस या परिसरात सागरी मार्गावर गेली दोन वर्षे सातत्याने बिबट्याचे हल्ले होत आहेत. हल्ले झाल्यानंतर तातडीने वनविभागाला कळविले जात होते. मात्र बिबट्या पकडण्यात अपयशच येत होते. बिबट्याला पकडण्यासाठी वेगवेगळ्या भागातून टीमही आल्या होत्या.
या परिसरात वनविभागातर्फे गस्त सुरू होती. मात्र बिबट्या आपला मार्ग बदलत असल्याने वनविभागाच्या पिंजऱ्यात सापडत नव्हता. रेस्क्यू टीमचे कॅमेरे व पिंजरे लावले की बिबट्या कुठेच दिसायचा नाही. त्यामुळे त्याला पकडण्यासंदर्भात कोणताही ठोस उपाय करूनही तो मिळत नसल्याने गावात भीतीचे वातावरण होते.
गुरुवारी सकाळी अखेर बिबट्या पिंजऱ्यात जर बंद झाल्याचे आढळून आले. गावातील ग्रामस्थांनी याची माहिती वनविभागाला दिल्यावर विभागाचे पथक घटनास्थळी आले. त्यांनी या बिबट्याला ताब्यात घेतले आहे.