भारताचा 74 वा स्वातंत्र्यदिन शनिवारी देशभर आणि विदेशातही साजरा झाला.कोव्हिड 19 अर्थात कोरोनाचे संकट जगभर आणि हिंदुस्थानात थैमान घालत असताना आणि दक्षिण महाराष्ट्र व उत्तर कर्नाटकात महापुराचे संकट वाकुल्या दाखवत असताना घरात कोंडून राहिलेल्या जनतेचे या स्वातंत्र्यदिन सोहळय़ाकडे लक्ष होते. आपले शेजारी चीन, पाकिस्तान आणि नेपाळ यांची बदललेली भूमिका, सीमेवरचे तंटे, नवे निर्माण केले जात असलेले नकाशे, सीमेवरच्या चकमकी आणि वरि÷ पातळीवरच्या वाटाघाटी या पार्श्वभूमीवरही यंदाचा स्वातंत्र्यदिन आणि पंतप्रधान, राष्ट्रपती यांची राष्ट्राला संबोधन करून केलेली भाषणे याकडे सर्वाचे लक्ष होते. राष्ट्रपती व पंतप्रधान यांनी कुरबुरी करणाऱया शेजाऱयांना थोडे चिमटे काढले पण भाषणाचा प्रमुख रोख संकटात संधी आणि मोठमोठी स्वप्ने दाखवण्याकडेच होता. अशी स्वप्ने वारंवार दाखवली जात आहेत, त्यादृष्टीने हे सारे तेच ते होते पण घरात कोंडलेल्या व संकटाने घेरलेल्या जनतेला याशिवाय वेगळा पर्यायपण नव्हता. नरेंद्र मोदी हे लाल किल्ल्यावर सलग सात वेळा ध्वजारोहण व भाषण करणारे बिगर काँग्रेसी पंतप्रधान आहेत. अवघ्या भारतवर्षाचे लाल किल्ला व पंतप्रधानांच्या भाषणाकडे लक्ष होते, ते कोरोना लस व त्या संदर्भात नरेंद्र मोदी काय बोलतात याकडे? पण अशी ठोस घोषणा झाली नाही कारण अजून अशी लस तयार झालेली नाही. ती दृष्टिक्षेपात आहे, पण पंधरा ऑगस्टचा मुहूर्त चुकला आहे. रशियाच्या राष्ट्राध्यक्षांनी रशियात लस विकसित झाली व आपण आपल्या मुलीला ती दिली अशी चार दिवसापूर्वी घोषणा केली होती. रशियाची ही लस वादात आहे हा भाग वेगळा पण जगात आज कोरोनाविरुद्ध जी लढाई सुरू आहे त्यामध्ये कोण बाजी मारतो याला महत्त्व आलेले आहे. मोदी व भारत बाजीगर होतात का याकडे सर्वांचे लक्ष होते पण तसे काही झाले नाही. मोदी 15
ऑगस्टचा मुहूर्त साधणार, लसीची घोषणा होणार अशी चर्चा गेले काही दिवस सोशल मीडियावर होती. हैद्राबाद, पुणे वगैरे ठिकाणी सुरू असलेले प्रयत्न यांचा हवाला दिला जात होता. सारे जग कोरोनामुळे अडचणीत आहे या पार्श्वभूमीवर उत्सुकता ताणली होती. पण हे झाले नाही आणि लगेच होईल असे दिसत नाही. पंतप्रधान मोदींनीही या बाबतीत कोणतीही संधिग्धता ठेवली नाही. अजून लस तयार नाही. भारतात एक-दोन नव्हे तर तीन ठिकाणी प्रयोग व चाचण्या प्रगतीपथावर आहेत. लस तयार झाली, शास्त्रज्ञांनी हिरवा कंदील दाखवला की त्याची उपलब्धता, वितरण आणि सर्व देशभर त्याचा लाभ यासाठी योजना तयार आहे. यंत्रणा, आराखडा केला आहे असे स्पष्ट करत मोदींनी या विषयावर पडदा टाकला. लोकांचा अपेक्षाभंग झाला पण इलाज नव्हता. उपलब्ध माहितीनुसार कोरोनावरची भारतातली लस तयार होण्यास नोव्हेंबर महिना उजाडेल. काम गतीने प्रगतीप्रथावर आहे. पण चाचण्या पूर्ण होऊन, मान्यता व उपलब्धता याला काही काळ जाणार हे उघड आहे आणि तोपर्यंत सावधानता, सतर्कता, मास्क, सामाजिक अंतर, सॅनिटायझर, स्वच्छता हीच लस आहे हे लक्षात घेतले पाहिजे. मोदींच्या दीर्घ भाषणात नवे काहीच नव्हते असे नाही. त्यांनी मुलींचे लग्नाचे वय 18 वरून 21 करण्याचे सूतोवाच केले. आता ते सर्वमान्य होते का आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी होईल का हे बघावे लागेल. पण लोकसंख्या नियंत्रण व मुलींना लहान वयात लग्न, बाळंतपण यातून थोडाफार दिलासा मिळू शकेल. मुलाचे 21 व मुलीचे 18 हे सध्याचे लग्नाचे कायदेशीर वय आहे. आता मुलीचे 21 झाले तर मुलांचे 24 होणार हे ओघाने आले. त्यासाठी कायदा होणार नाही पण अंतर हा विषय असतो त्यामुळे ओघानेच ते होईल. सगळय़ा गोष्टी कायद्याने होत नसतात. सामाजिक सुधारणा या प्रबोधनाने कराव्या लागतात. त्या दिशेने पावले पडत असली तरी लग्न, त्यासाठीच्या अपेक्षा, कायदे, व्यवहार, अडचणी असे मोठे कोडे तयार होताना दिसत आहे. लोकांनीच जमिनीवर राहून त्यातून मार्ग काढला पाहिजे. पण मोदींनी सामाजिक सुधारणेसाठी एक पाऊल टाकले असे म्हटल्यास चुकीचे नाही. मोदींनी शेती सुधारणा व पायाभूत सुविधांवर भर देणार असे म्हटले ते गरजेचे आहे. मोदींनी भाषणात एक उदाहरण देऊन आत्मनिर्भर भारतचा पुनरूच्चार केला. सरकारची पावलेही त्या दिशेने पडत आहेत असे ते म्हणाले. घरात एखादा तरुण मुलगा 20 वर्षाचा झाला की घरातील वडील मंडळी त्याला आता स्वतःच्या पायावर उभे रहा असे सांगतात, हे पायावर उभे राहणे म्हणजे आत्मनिर्भर होणे. देश स्वतंत्र होऊन 74 वर्षे झाली. आतातरी देश आत्मनिर्भर झाला पाहिजे आणि त्यात चुकीचे काहीच नाही. भारत स्वयंपूर्ण झाला पाहिजे. शक्तिमान झाला पाहिजे आणि आघाडीवरील देशांच्या यादीत प्रथमस्थानी असला पाहिजे. पण त्यासाठी केवळ इच्छा वा घोषणा पुरेशी नाही. कठोर मेहनत आणि योग्य दिशेने अखंड वाटचाल करावी लागेल. स्वदेशीचा नारा नव्याने पुन्हा बळावला असला तरी स्वदेशी म्हणजे सर्वच परकीय वस्तूंवर बहिष्कार नव्हे असे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटले आहे. स्वदेशी हे धोरण असले पाहिजे. स्वदेशीचा पुरस्कार केला पाहिजे पण विश्वसमुदायासोबत व्यापार, उदीमही सांभाळला पाहिजे. अवघ्या जगाची अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान आणि गती प्रगती कूस बदलणार हे स्पष्ट आहे. अशावेळी सजग व आघाडीवर राहिले पाहिजे. कोरोनाच्या या संकटात स्वातंत्र्यदिन साजरा झाला, यातून देशभक्ती व दृढसंकल्प,शिस्त यांचे दर्शन झाले त्याचा आनंद व अभिमान आहे. तथापि, कोरोना लस घोषणेऐवजी मोदींना कोरोना संपर्कात आले म्हणून क्वारंटाईन व्हावे लागते का अशी शक्मयता निर्माण झाली होती पण सुदैवाने तसे झाले नाही. कोरोना साथ हात-पाय पसरते आहे. त्यापासून वाचले पाहिजे. पंतप्रधानांपासून शेतात राबणाऱया मजुरापर्यंत सर्वांनी काटेकोर काळजी घेतली पाहिजे. संकट गहिरे आहे. लोकांची नोकरी, उद्योग, व्यापार, संकटात आहे. अशावेळी स्वातंत्र्यदिन आणि लाल किल्यावरून भाषण ठीक आहे. राष्ट्रभक्तीचे दर्शन आहे. पण मूळ प्रश्नांना भिडणे व शेजारी जे नकाशे बदलू पहात आहेत त्यांना वठणीवर आणून भारताचा तिरंगा सर्वार्थाने उंचावणे महत्त्वाचे आहे. सरकार त्या दिशेने बोलते आहे पण कृती व्हायला हवी. पुढचा स्वातंत्र्य दिन 75 वा आहे. तोवर कोरोनासह सर्व समस्येवर मात करून बलशाली भारताची पायाभरणी करुया.
Previous Articleलस मिळेल, लस संपली
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.