वृत्तसंस्था / नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 30 मे 2014 रोजी देशाची धुरा हाती घेतली होती. 5 वर्षे यशस्वीपणे सरकार चालविल्यावर 2019 मध्ये देखील मोदींना प्रचंड विजय मिळाला होता. 30 मे 2019 रोजी मोदींनी पंतप्रधानपदाची दुसऱयांदा शपथ घेतली होती. 30 मे 2022 रोजी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला 8 वर्षे पूर्ण होणार आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपकडून मोठय़ा जल्लोषाची तयारी केली जात आहे.
भाजप अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा हे 25 मे रोजी पक्ष मुख्यालयात एक महत्त्वाची बैठक घेणार आहेत. या बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि संघटन महामंत्री बी.एल. संतोष यांच्याह सर्व केंद्रीय मंत्री उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत सरकारला 8 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त केल्या जाणाऱया जल्लोषाची रुपरेषा ठरणार आहे. नड्डा यांनी या कार्यक्रमासंबंधी पक्षाच्या स्तरावर एका समितीची पूर्वीच स्थापना केली आहे.
सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण
भाजप 30 मेपासून 14 जूनपर्यंत देशव्यापी कार्यक्रम आयोजित करणार आहे. 19 मे रोजी जयपूरमध्ये झालेल्या भाजप पदाधिकारी बैठकीत या कार्यक्रमासंबंधी माहिती देण्यात आली होती. भाजपने हा कार्यक्रम ‘सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण’च्या थीमेवर आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. 15 दिवसांच्या कार्यक्रमात सर्व केंद्रीय मंत्री विविध शहरांचा दौरा करणार आहेत. केंद्रीय योजनांच्या सर्व लाभार्थींशी पक्षाचे नेते या कार्यक्रमाच्या अंतर्गत संवाद साधणार असल्याची माहिती भाजप नेते विनोद तावडे यांनी दिली आहे.
कामांचा लेखाजोखा 25 मे रोजी होणाऱया बैठकीत पक्ष स्वतःच्या नेत्यांना आणि केंद्रीय मंत्र्यांना या कार्यक्रमासाठी जबाबदारी सोपविणार आहे. बैठकीचा अजेंडा केंद्रातील मोदी सरकारकडून 8 वर्षांमध्ये करण्यात आलेल्या विकासकामांबद्दल जनतेला माहिती देण्याशी संबंधित आहे. प्रत्येक मंत्र्याला किमान 4 लोकसभा मतदारसंघांची जबाबदारी देण्यात येईल. सर्व मतदारसंघांमधील लाभार्थींपर्यंत मोदी सरकारच्या 8 वर्षांच्या कामाचा लेखाजोखा पोहोचविण्याचा प्रयत्न पक्ष करणार आहे