जम्मू-काश्मीर/प्रतिनिधी
काँग्रेस नेते राहुल गांधी दोन दिवसांच्या जम्मू-काश्मीर दौऱ्यावर आहेत. नुकतंच त्यांनी १५ किलो मीटर पायी जात माता वैष्णवी देवीचे दर्शन घेतलं असून त्याचा व्हिडिओही काँग्रेसने प्रसारित केला आहे. या दौऱ्यादरम्यान त्यांनी त्रिकुटा नगर येथे काँग्रेस कार्यकर्त्यांना संबोधित केलं. यावेळी राहुल गांधी यांनी आपल्या भाषणाची सुरुवात ‘जय माता दी’ने केली. ते इतक्यावर थांबले नाहीत तर उपस्थित कार्यकर्त्यांकडूनही त्यांनी ‘जय माता दी’चा जयघोष करून घेतला. “मी वैष्णो देवीचं दर्शन घेतलं. मला असं वाटतंय की माझ्या घरी आलो आहे.” असं त्यांनी भाषणादरम्यान सांगितलं. तसेच मोदी सरकारच्या निर्णयांमुळे देवी लक्ष्मी, सरस्वती आणि दुर्गेची शक्ती कमी झाली, असा आरोपही त्यांनी केला आहे.
दरम्यान राहुल गांधी यांनी “काल मी मंदिरात गेलो होतो. मंदिरात लक्ष्मी, सरस्वती आणि दुर्गा देवी होती. दुर्गा या शब्दाचा अर्थ आहे रक्षण, लक्ष्मीचा अर्थ आहे लक्ष्य पूर्ण करा आणि सरस्वतीचा अर्थ आहे आम्हाला विद्या द्या. या तीन शक्तिंमुळे देशाचा विकास होतो.” असं राहुल गांधी यांनी यावेळी सांगितलं. पण “नोटबंदी, जीएसटीमुळे लक्ष्मी घटली. नव्या कृषि कायद्यांमुळे दुर्गा शक्ती कमी झाली आणि विद्यालयात संघाची लोकं बसवून सरस्वतीची शक्ती कमी झाली. जे लोक स्वताला मोठे हिंदू समजतात, त्यांनी दुर्गा, लक्ष्मी आणि सरस्वतीचा अपमान केला आहे. ही लोकं देवीच्या मंदिरात डोकं टेकतात आणि त्यांची शक्ती कमी करण्याचा काम करतात”, असं बोलत त्यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला.