वृत्तसंस्था /बीजिंग :
भारत आणि चिनी सैन्यामधील हिंसक झटापटीच्या 3 महिन्यांनी चीनचे शासकीय वृत्तपत्र ग्लोबल टाईम्सने द्विपक्षीय संबंधांवरून सर्वेक्षण करविले आहे. या सर्वेक्षणाचे निष्कर्ष पाहता चिनी लोक स्वतःच्या नेत्यांच्या कृतीने संतुष्ट नसल्याचे दिसून येते. तर सर्वेक्षणात सुमारे 51 टक्के चिनी लोकांनी भारतातील मोदी सरकारची प्रशंसा केली आहे.
भारतात चीनविरोधी मानसिकता अत्यंत अधिक असल्याचे 70 टक्के चिनी लोकांनी म्हटले आहे. तर आगामी काळात दोन्ही देशांमधील संबंध सुधारतील, असे 30 टक्के लोकांचे मत आहे. कमी कालावधीत संबंध सुधारणार असल्याचे 9 टक्के लोकांनी नमूद केले आहे. तर दीर्घावधीत संबंधांमध्ये चांगला बदल होणार असल्याचे 25 टक्के चिनी नागरिकांनी म्हटले आहे.
भारतीय अर्थव्यवस्था चीनवर अत्यंत अधिक प्रमाणात निर्भर असून अलिकडच्या निर्णयांमुळे भारताला नुकसान झाल्याचे 50 टक्के चिनी मानतात.
याच दरम्यान आंतरराष्ट्रीय स्तरावर वादात सापडलेली चिनी तंत्रज्ञान कंपनी हुवावे भारतीयांना आकर्षित करण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहे. हुवावे मोठमोठय़ा जाहिराती देत आहे. भारताबद्दल प्रतिबद्ध असून मागील 20 वर्षांपासून भारतात काम करत असल्याचे हुवावे कंपनीने म्हटले आहे.