कर्जदारांना ईएमआयपासून आणखी दिलासा शक्य : अर्थमंत्र्यांचे संकेत
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ईएमआयवरील कर्ज स्थगितीची सुविधा (मोरेटोरियम) वाढविण्याचे संकेत दिले आहेत. कर्जाचे हप्ते आणखी काही कालावधीसाठी स्थगित ठेवण्यासंबंधी रिझर्व्ह बँकेशी चर्चा सुरू असल्याची माहिती अर्थमंत्र्यांनी ‘फिक्की’च्या एका कार्यक्रमामध्ये दिली. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सर्वप्रथम ही सुविधा मार्च ते 31 मे या तीन महिन्यांसाठी लागू करण्यात आली होती. त्यानंतर आणखी तीन महिन्यांसाठी वाढवून 31 ऑगस्टपर्यंत मुदत वाढविण्यात आली होती. आता ही मुदत आणखी वाढविण्याबाबत सरकार आणि आरबीआय यांच्यात चर्चा सुरू आहे.
कोरोना संसर्गाच्या अभूतपूर्व संकटाने देशाची अर्थव्यवस्था विस्कळीत झाली आहे. सर्वसामान्य जनतेसह नोकरदारांवरही त्याचा विपरित परिणाम झालेला आहे. अनेक व्यवसायावर वाईट परिणाम झाला आहे. अशा परिस्थितीत सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी सरकारकडून अनेक पावले उचलली जात आहेत. अजूनही यावर वेगवेगळय़ा उपाययोजना सुरू करण्यासंबंधी अर्थ मंत्रालयाकडून खलबते सुरू आहेत. तसेच आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनीही कोरोनापासून अर्थव्यवस्था वाचविण्यासाठी रिझर्व्ह बँक सर्व शक्मय उपाययोजना करण्यास तयार असल्याचे आश्वासन यापूर्वी दिले आहे.
केंद्र सरकारने जाहीर केलेल्या निर्देशांमुळे गेल्या तीन-चार महिन्यांमध्ये अनेक कर्जदारांनी आपले हप्ते भरलेले नाहीत. परिणामी, बँकेच्या व्यवहार आणि उत्पन्नावर त्याचा परिणाम झालेला दिसून येत असल्याने अनेक बँकांनी मोरेटोरियमला विरोध केला आहे.