प्रतिनिधी बेळगाव
डीसीआयबीच्या अधिकाऱयांनी मिरज येथील एका युवकाला अटक करुन त्याच्या जवळून सव्वा क्विंटल गांजा जप्त केला आहे. मिरजहून चिकोडी, बेळगाव, धारवाडला गांजापुरवठा करण्यासाठी तेलंगणाहून साठा मागविण्यात येत होता, अशी धक्कादायक माहिती उजेडात आली आहे.
जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी यांनी शनिवारी ही माहिती दिली आहे. डीसीआयबीचे पोलीस निरीक्षक निंगनगौडा पाटील व त्यांच्या सहकाऱयांनी ही कारवाई केली असून प्रत्येकी दोन किलोच्या 60 गांजाची पाकिटे एमएच 01 एएल 2174 क्रमांकाची कार, एमएच 10 डीके 9165 क्रमांकाची होंडा ऍक्टीव्हा असा एकूण 28 लाख 50 हजार रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी जप्त केलेल्या 120 किलो गांजाची किंमत 24 लाख रुपयांइतकी होते. अश्पाक मैनुद्दीन मुल्ला (वय 43, रा. दर्गाचौक, माळी गल्ली, मिरज) असे अटक करण्यात आलेल्या युवकाचे नाव आहे. म्हैशाळजवळ त्याने आपली कार उभी केली होती. या कारच्या डिकीत 40 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. तर म्हैशाळ-जत पाणी योजनेच्या पंपहाऊसजवळ त्याने साठवून ठेवलेला 78 किलो गांजा पोलिसांनी जप्त केला आहे.
तेलंगणामधील वारंगल व हैद्राबाद येथील दोघा जणांकडून आपण हा साठा खरेदी केल्याची कबुली अश्पाकने दिली आहे. केवळ मिरज, सांगलीच नव्हे तर चिकोडी, बेळगाव, धारवाडलाही अश्पाक गांजाचा पुरवठा करीत होता. डीसीआयबीचे पोलीस निरीक्षक निंगनगौडा पाटील, साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक डी. के. पाटील, व्ही. व्ही. गायकवाड, टी. के. कोळची, अर्जुन मसरगुप्पी, एल. टी. पवार, जयराम हंमण्णावर, एस. एम. मंगण्णावर, एम. आय. पठाण आदींनी ही कारवाई केली.
22 सप्टेंबर रोजी मिरज येथील वसीम शेख याला अटक करुन दोन किलो गांजा जप्त करण्यात आला होता. त्यानंतर जिल्हा पोलीस प्रमुखांनी या प्रकरणाची चौकशी डीसीआयबीकडे सोपविली. अधिकाऱयांनी अश्पाकला अटक करुन सव्वा क्विंटल गांजा जप्त केला आहे. तेलंगणामधील आणखी दोघे जण फरारी झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.