वृत्तसंस्था /दुबई
यंदा भारतात होणारी टी-20 क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धा 17 ऑक्टोबरपासून संयुक्त अरब अमिरातमध्ये खेळवली जाईल आणि दि. 14 नोव्हेंबरला या स्पर्धेची फायनल रंगेल, असे जवळपास निश्चित झाले आहे. आयपीएल स्पर्धा झाल्यानंतर दोनच दिवसात या विश्वचषकाला सुरुवात होईल, असे यामुळे प्रथमदर्शनी चित्र आहे. सध्या जाहीर केल्या गेलेल्या रुपरेषेनुसार, आयपीएलची फायनल 15 ऑक्टोबरला होणार आहे. आयपीएलच्या या उर्वरित टप्प्याची सुरुवात दि. 19 सप्टेंबरपासून होणे अपेक्षित आहे.
अद्याप बीसीसीआयने आयसीसीला टी-20 वर्ल्डकपच्या फेरनियोजनाबाबत रितसर कळवलेले नाही. मात्र, या दृष्टीने बीसीसीआयने नियोजन सुरु केले असल्याचे स्पष्ट संकेत आहेत.
सध्या हाती आलेल्या माहितीनुसार, टी-20 विश्वचषक स्पर्धा 2 गटातून होईल आणि या गटातील सामने युएई व ओमान येथे खेळवले जातील.
पहिल्या फेरीत 8 अव्वल संघ थेट सहभागी होतील तर बांगलादेश, श्रीलंका, आयर्लंड, नेदरलँडस, स्कॉटलंड, नामिबिया, पापुआ न्यू गिनिया यांच्यातून 4 संघ मुख्य फेरीत निवडले जातील.
सुपर-12 फेरीत 30 सामने होणार असून त्याची सुरुवात 24 ऑक्टोबर रोजी होईल. सुपर-12 फेरीत प्रत्येकी 6 संघांचे 2 गट असतील अणि दुबई, अबुधाबी, शारजाह येथे सामने रंगतील. त्यानंतर 3 प्ले-ऑफ- दोन सेमीफायनल व 1 फायनल अशा लढती होणार आहेत.
पहिल्या फेरीतील सामने युएई व ओमानमध्ये विभागले गेले असल्याने खेळपट्टी रिप्रेश असतील, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे. तूर्तास, आयसीसीने या स्पर्धेच्या यजमानबाबत निर्णय घेण्यासाठी दि. 1 जूनपर्यंत वेळ दिला असून बीसीसीआय लवकरच याबाबत अधिकृत घोषणा देईल, असे सूत्रांनी म्हटले आहे.
केवळ दोनच दिवसांचा वेळ चिंतेचा ठरणार?
आयपीएलची फायनल व विश्वचषक स्पर्धेतील सलामीची लढत यात केवळ दोनच दिवसांचे अंतर असल्याचे दोन्ही स्पर्धांच्या वेळापत्रकावरुन दिसून येत असून ही चिंतेची बाब ठरु शकते.
विशेषतः आयपीएल फायनलमध्ये समाविष्ट असलेल्या व विश्वचषक सलामी लढतीत समाविष्ट असलेल्या खेळाडूंना यातील एक लढत सोडून द्यावी लागू शकते आणि याचा त्या संघाला फटका बसू शकतो.