मुंबई \ ऑनलाईन टीम
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे महाराष्ट्र बोर्ड दहावीच्या २०२१ परीक्षेचा निकाल हा,आज, १६ जुलै २०२१रोजी ऑनलाइन पद्धतीने घोषित करण्यात येणार आहे. कोरोनाच्या अभूतपूर्व संकटामुळे यंदा दहावीची परीक्षा घेण्यात आली नाही. त्यामुळे अंतर्गंत मूल्यमापनाच्या आधारे यंदा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. हा निकाल विद्यार्थ्यांना ऑनलाईन समजणार आहे. यावेळी दहावीचा निकाल ९९.९५ टक्के लागल्याचे राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी जाहीर केले. यंदा दहावीच्या निकालात कोकण विभागाने बाजी मारली आहे. तसेच यंदाच्या दहावी निकालात मुलींनीच बाजी मारली आहे.
अध्यक्ष दिनकर पाटील यांच्या माहितीनुसार, यंदा १५ लाख ७५ हजार ८०६ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्ज भरला होता. राज्यात नऊ विभागीय मंडळाने घेतलेल्या परीक्षेचा निकाल ९९.९५ टक्के लागला आहे. यंदा कोकण विभागाचा निकाल १०० टक्के लागला आहे. तर नागपूर विभागाचा निकाल ९९.८४ टक्के लागला आहे. २२ हजार ३८४ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. तसेच दहावीच्या २७ विषयांचा निकाल १०० टक्के लागला असून ८३ टक्के विद्यार्थ्यांना ९० पेक्षा अधिक गुण मिळाले आहेत.
राज्यात यंदाही दहावीच्या निकालामध्ये मुलांपेक्षा मुली वरचढ ठरल्या आहेत. यंदाच्या वर्षी दहावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थिनींचा निकाल ९९.९६ टक्के लागला असून विद्यार्थ्यांचा निकाल ९९.९४ टक्के लागला आहे. तर दिव्यांग विद्यार्थ्यांनीही उत्तम कामगिरी केली असून त्यांचा निकाल ९७.८४ टक्के लागला आहे. तर खासगी विद्यार्थी म्हणून नोंदणी केलेल्यांची संख्या २८ हजार ४२४ असून त्यांचा निकाल ९७.४५ टक्के लागला आहे.