तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या विविध विभागामार्फत उपायोजना राबविल्या जात आहेत. या उपायोजनांमध्ये सातत्य राखणे गरजेचे असल्याने यंदाच्या वर्षात कोणत्याही संवर्गातील अधिकारी अथवा कर्मचारी यांची बदली न करण्याचा निर्णय शासन स्तरावर घेण्यात आला आहे. यासंदर्भात अप्पर पोलीस महासंचालक कुलवंत सारंग, यांनी आदेश काढले आहेत. यामुळे यंदा पोलिसांना बदलीकरिता वर्षभर वाट पहावी लागणार आहे.
देशांमध्ये तसेच महाराष्ट्रामध्ये कोरोना विषाणूची साथ मार्च महिन्यामध्ये पसरण्यास सुरुवात झाली होती. कोरोना विषाणूची साथ रोखण्यासाठी शासन स्तरावर विविध पातळीवरून प्रयत्न केले जात आहेत. यामध्ये पोलीस विभागदेखील महत्त्वाचा घटक आहे. विषाणूचा प्रसार थोपवण्यासाठी शासनामध्ये विविध विभागांतर्गत उपाययोजना केल्या जात आहेत. या उपाययोजनांमध्ये सातत्य राखणे गरजेचे असल्याची बाब लक्षात घेऊन चालू वित्तीय वर्षात कोणत्याही संवर्गातील अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांची बदली करणार नसल्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. शासनाचा पुढील आदेश होईपर्यंत आपल्या घटकातील कार्यरत असलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्या करू नयेत, असे आदेश अपर पोलिस महासंचालकांना दिले आहेत. शासनाच्या या निर्णयामुळे कोरोना विषाणूच्या उपाययोजनांमध्ये सातत्य ठेवण्यास मदत होणार असले तरी काही पोलिसांनी कौटुंबिक, वैद्यकीय तसेच सोयीच्या ठिकाणी बदलीसाठी विनंती अर्ज केलेले आहेत. या आदेशामुळे त्याला ब्रेक लागणार आहे. त्यामुळे एक वर्ष त्यांना पुन्हा वाट पाहावी लागणार आहेत. तर बिनकामी आणि निष्क्रिय, कामचुकार असलेल्या पोलीस अधिकारी कर्मचा-यांना आणखी एक वर्ष सोसून घ्यावे लागणार आहे.
काही अटींमध्ये शिथीलता आणून जनजीवन सुरळीत करण्याचा प्रयत्न शासनाकडून करण्यात येत आहे याच संदर्भाने मार्च-एप्रिल महिन्यात होणाऱ्या बदल्या होतील अशी चर्चा सुरू होती परंतु अप्पर पोलीस महासंचालकांनी काढलेल्या आदेशामुळे बदलीच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.