13 फेब्रुवारीला पहिला टप्पा सुरु होण्याचे संकेत, पहिल्या टप्प्यात साखळी तर दुसऱया टप्प्यात बाद फेरी शक्य
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
सध्या लांबणीवर टाकली गेलेली रणजी चषक क्रिकेट स्पर्धा दोन टप्प्यात खेळवली जाईल, अशी घोषणा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष जय शाह यांनी शुक्रवारी केली. 38 संघांचा समावेश असलेली ही स्पर्धा दि. 13 फेब्रुवारीपासून खेळवली जाईल, असे सध्याचे संकेत आहेत.
कोरोनामुळे मागील वर्षी रणजी स्पर्धा होऊ शकली नाही. यंदा दि. 13 जानेवारीपासून स्पर्धेला सुरुवात करण्याचे मंडळाचे नियोजन होते. पण, तिसऱया लाटेची शक्यता गृहित धरुन त्यावेळी देखील स्पर्धा आणखी लांबणीवर टाकावी लागत असल्याचे जाहीर केले गेले.
‘या हंगामात रणजी चषक स्पर्धा दोन टप्प्यात खेळवण्याचा निर्णय मंडळाने घेतला. पहिल्या टप्प्यात सर्व साखळी सामने होतील आणि त्यानंतर दुसऱया टप्प्यात जूनमध्ये बाद फेरीचे सर्व सामने होणार आहेत’, असे जय शाह यांनी शुक्रवारी पत्रकातून नमूद केले. स्पर्धेतील सर्व सामने सुव्यवस्थित संपन्न व्हावेत, यासाठी आमचे पथक कार्यरत आहे, याचा त्यांनी पुढे उल्लेख केला.
‘रणजी चषक ही आमची सर्वात प्रतिष्ठेची स्पर्धा आहे आणि या स्पर्धेचे अलौकिक योगदान मंडळ जाणून आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून सातत्याने ताज्या दमाचे नवे खेळाडू लाभत आले आहेत. या स्पर्धेचे हित जपण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलली जातील’, असे शाह याप्रसंगी म्हणाले.
आयपीएल स्पर्धेमुळेच रणजी दोन टप्प्यात
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ दि. 27 मार्चपासून आयपीएल स्पर्धा भरवण्यासाठी प्रयत्नशील असून एकाच वेळी दोन स्पर्धा घेणे शक्य नसल्याने रणजी स्पर्धा विभागून घेण्यावर शिक्कामोर्तब करावे लागले असल्याचे चित्र आहे. दोन्ही स्पर्धा एकाच वेळी घेतल्यास खेळाडूंची उपलब्धता हा मुख्य अडसर निर्माण झाला असता. तो टाळण्यासाठी पहिल्या टप्प्यात साखळी फेरी व दुसऱया टप्प्यात बाद फेरी, असे आयोजन केले गेले.