यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे व्याख्यान
कोल्हापूर प्रतिनिधी
महाराष्ट्राला सर्व क्षेत्रात प्रगती, विकासाकडे नेण्याचे महत्वपूर्ण कार्य यशवंतराव चव्हाण यांनी केले. राजकारणाच्या पलिकडे जाऊन विकासाची दृष्टी असणारे यशवंतराव खऱया अर्थात महाराष्ट्राचे शिल्पकार आहेत, आहे प्रतिपादन प्रा. डॉ. सुजय पाटील यांनी केले.
यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीचे औचित्य साधून यशवंतराव चव्हाण फौंडेशनच्या वतीने महापालिकेच्या टेंबलाईवाडी विद्यालयात व्याख्यानाचे आयोजन केले होते. ‘यशवंतराव चव्हाण साहेब एक विविधांगी व्यक्तीमत्व’ या विषयावर डॉ. सुजय पाटील उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. व्याख्यानाच्या अध्यक्षस्थानी उद्योजक विनोद डुणुंग होते.
डॉ. पाटील म्हणाले, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री नव्हते तर त्यांनी देशाचे गृहमंत्री, संरक्षणमंत्री, अर्थमंत्री, पराराष्ट्रमंत्री, उपपंतप्रधानपदाचीही जबाबदारी पार पाडली. देशासाठी एवढी मंत्रीपदे सांभाळणारे चव्हाण एकमेव महाराष्ट्रीय नेते आहेत. त्यांनी महाराष्ट्राची निर्मिती केली नाही तर आधुनिक महाराष्ट्र उभारला. शिक्षण, आरोग्य, कृषी, सहकार, क्रीडा, उद्योग, दळणवळण आदी क्षेत्रात चव्हाण यांनी दूरदृष्टीतून साकारलेल्या उपक्रम, योजनांमुळे महाराष्ट्राचा विकास झाला. सत्तेचे विकेंद्रीकरण करून पंचायत राज योजना त्यांनी सुरू केली. सहकारातील साखर कारखाने, सोसायटय़ा, पंतसंस्था, जिल्हा बँकांना चालना देवून त्यांनी ग्रामीण अर्थव्यवस्था सशक्त केली. पाटबंधारे विभागाच्या माध्यमातून त्यांनी राज्यभर जलसिंचन योजना उभारून राज्याला कृषी क्षेत्रात पुढे नेले. खेडेगाव, वाडय़ा वस्त्यांवर शिक्षण पोहचविण्यासाठी त्यांनी रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्षपद भूषविले. ग्रामीण भागात शाळा, विद्यालये, महाविद्यालयांची स्थापना त्यांच्या पुढाकाराने झाली. शिवाजी विद्यापीठाच्या उभारणीतही त्यांचे योगदान होते, असेही डॉ. पाटील यांनी सांगितले. व्याख्यानाचे नियोजन फौंडेशनचे उपाध्यक्ष अशोक पोवार, रमेश मोरे, विजयसिंह पाटील यांनी केले. स्वागत, प्रास्ताविक मुख्याध्यापक विलास पिंगळे यांनी केले. आयोजन संगीता खांडेकर, मिनाक्षी लोखंडे यांनी केले. आभार दिग्विजय नाईक यांनी मानले.