यऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार इयान चॅपेल, पायचीतच्या नियमात मूलभूत बदल करण्याचा प्रस्ताव
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार व समालोचक इयान चॅपेल यांनी पायचीतच्या नियमावलीत मूलभूत बदल करण्याचा प्रस्ताव मांडला असून कोणत्याही टप्प्यावर पडलेला चेंडू यष्टीच्या रोखाने जात असेल तर त्याला पायचीत दिले जावे, असा बदल त्यांनी सुचविला आहे.
त्याचप्रमाणे स्विंग गोलंदाजीला उत्तेजन मिळावे यासाठी सर्व कर्णधारांनी गोलंदाजांशी चर्चा करून एखाद्या पद्धतीस मान्यता द्यावी, असेही त्यांनी सुचवले आहे. चेंडूला लकाकी आणण्यासाठी गोलंदाज घाम किंवा लाळेचा उपयोग करताना दिसतात. पण आता कोव्हिड-19 महामारीनंतरच्या काळात तसे करणे धोक्याचे ठरण्याची शक्यता असल्याने आयसीसीदेखील यासाठी कृत्रिम पदार्थाचा वापर करण्याची परवानगी देण्याबाबत विचार करीत आहे. ‘पायचीतचा नवा नियम असा असायला हवा : बॅटला स्पर्श होण्याआधी कोणत्याही टप्प्यावर पडलेला चेंडू पॅडला आदळल्यास आणि तो यष्टय़ांवर आदळू शकला असता, असे पंचांना वाटल्यास आणि फलंदाजाने फटका मारण्याचा प्रयत्न केलेला असो अथवा नसो, अशावेळी फलंदाजाला बाद घोषित केले जावे.’ असे त्यांनी क्रीडा वेबसाईटवरील स्तंभात लिहिले आहे. यावेळी चेंडूचा टप्पा कुठे होता, चेंडू पॅडला आदळला तेव्हा यष्टीच्या रेषेत होता की नाही, याचा विचार न करता फलंदाजाला बाद दिले जावे, असे ते पुढे म्हणतात.
या नियमामुळे फलंदाजांकडून टीका होणार याची त्यांनी अपेक्षाही केली आहे. मात्र या नियमामुळे खेळात जास्त समतोलपणा येईल, असेही त्यांना वाटते. ‘या नियमाबद्दल मोठी ओरड होणार, हे निश्चित आहे, विशेषतः फलंदाजांकडून. पण या नियमामुळे खेळात अनेक सकारात्मक बदल होणार आहेत, समतोलपणा हा त्यातील सर्वात महत्त्वाचा बदल असेल. एखादा गोलंदाज यष्टीच्या रोखानेच सतत गोलंदाजी करीत असेल तर फलंदाजाला आपली विकेट राखण्यासाठी बॅटचाच वापर करावा लागेल. पॅडचा उपयोग हा फक्त दुखापत टाळण्यासाठी करायचा असतो, बाद होणे टाळण्यासाठी नव्हे. मनगटी स्पिनर उजव्या फलंदाजाला गोलंदाजी करताना त्याच्या लेगस्टंपच्या बाहेर पडलेल्या रफ पॅचचा नेहमी वापर करतात. पण या नियमामुळे फलंदाजांना अशा गोलदांजीला सामोरे जाताना आक्रमणाचा नवा मार्ग शोधणे गरजेचे होईल,’ असे चॅपेल म्हणाले. या संदर्भात त्यांनी 1997-98 मधील कसोटी मालिकेत सचिन तेंडुलकरने शेन वॉर्नच्या राऊंड द विकेट डावपेचाला यशस्वीरीत्या तोंड दिल्याची आठवण करून दिली.
सचिनने आक्रमक धोरण अवलंबून चेन्नई कसोटीत वॉर्नचे डावपेच फोल ठरवले होते. पण रफ पॅचमध्ये पडलेला चेंडू यष्टीच्या दिशेने जात असताना फलंदाजाने पॅडचा वापर करून तो दूर ढकलला तर असा खेळ पाहणे कोणालाही आवडणार नाही. सध्या प्रचलित असलेला नियम ‘पॅड प्ले’ करण्याला उत्तेजन देणारा आहे. पण प्रस्तावित नियमामुळे त्याला लेगस्टंपच्या बाहेर पडलेला चेंडूही बॅटने खेळणे भाग पडणार आहे. या नियमाचा गोलंदाजांनाही फायदा होईल. ते नेहमी यष्टीच्या रोखाने गोलंदाजी करतील आणि नकारात्मक किंवा वाईड चेंडू टाकण्याचे प्रकारही कमी होतील. या प्रस्तावित पायचीत नियमामुळे वारंवार डीआरएस घेण्याचे प्रमाणही कमी होईल आणि पंचांवरील ताणही कमी होणार आहे. डीआयएसमुळे अलीकडे खेळात बराच संथपणा आलेला आहे. या नियमामुळे खेळाची गतिमानताही वाढीस लागेल, असे त्यांना वाटते. याशिवाय चार दिवशीय कसोटी खेळण्याच्या विचारालाही या नियमामुळे चालना मिळेल, असे त्यांचे म्हणणे आहे.
सर्व कर्णधारांनी गोलंदाजांशी चर्चा करून चेंडू स्विंग होण्यास मदत होईल, अशा कृत्रिम वस्तूंची यादी तयार करावी, असे चॅपेल यांनी यापूर्वी सुचविले होते. क्रिकेट प्रशासकांनी त्याचा विचार करून त्यापैकी एक पद्धत अधिकृत करून त्याला मान्यता द्यावी, असे चॅपेल यांचे मत आहे.