राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा कर्नाटकात आहे. त्याला पर्याय म्हणून मंगळवार दि. 11 ऑक्टोबरपासून मुख्यमंत्री बसवराज बोम्माई, माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांच्या नेतृत्वाखाली भाजपने जनसंकल्प यात्रा सुरू केली आहे. 25 डिसेंबरपर्यंत 52 मतदारसंघात जनसंकल्प यात्रा फिरणार आहे. कर्नाटकात पक्षाला 150 जागा मिळवून देण्यासाठी ही यात्रा आहे, असे या दोन्ही नेत्यांनी जाहीर केले आहे. रायचूर जिल्हय़ातील गिल्लेसुगूर येथून यात्रेला सुरुवात झाली. अधूनमधून वेगवेगळय़ा मतदारसंघात यात्रा चालणार आहे. या काळात वेगवेगळय़ा ठिकाणी जाहीर सभाही होणार आहेत. यात्रेनिमित्त राज्याचा दौरा करताना टेम्पल रन मठाधीशांचेच दर्शन हे असणारच. याबरोबरच दलितांच्या घरी नाष्टा, भोजन करून सामाजिक समतोल साधण्याचा प्रयत्नही भाजप नेत्यांनी सुरू केला आहे. काँग्रेस आणि भाजपच्या यात्रांदरम्यान एकमेकांवर चिखलफेक करण्याचे प्रकारही सुरू आहेत.
काँग्रेसची भारत जोडो व भाजपच्या जनसंकल्प यात्रेला पर्याय म्हणून निजदचीही पंचरत्न यात्रा निघणार आहे. माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी व पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सी. एम. इब्राहिम यांच्या नेतृत्वाखाली 1 नोव्हेंबरपासून पंचरत्न यात्रेला सुरुवात होणार आहे. राष्ट्रीय पक्षांचा कारभार पुरे झाला. राज्याचा सर्वांगीण विकास व्हायचा असेल तर प्रादेशिक पक्षाच्या हाती राज्याची सत्तासूत्रे पाहिजेत. यासाठी यंदा निजदला सत्तेवर आणा, अशी साद घालण्यासाठी कुमारस्वामी यात्रेला निघणार आहेत. आजवर झालेल्या सर्वेक्षणात त्रिशंकू अवस्था निर्माण होणार, अशी शक्मयता वर्तविल्यामुळेच कर्नाटकात ही परिस्थिती येऊ नये म्हणून भाजप व काँग्रेस या दोन प्रमुख राष्ट्रीय पक्षंाचे प्रयत्न सुरू आहेत. आगामी निवडणुकीत पक्षाचे संख्याबळ वाढवून एकतर स्वबळावर सत्तेवर यायचे नाहीतर दोन्ही राष्ट्रीय पक्षांना स्वतःच्या तालावर नाचवण्याची खेळी निजदने आखली आहे. माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा वयोमानानुसार सध्या आपल्या घरीच आहेत. पंचरत्न यात्रेत अधूनमधून तेही दिसणार आहेत. ही आपली शेवटची निवडणूक आहे म्हणून आपल्याला पुन्हा एकदा संधी द्या, अशी भावनिक साद ते मतदारांना घालणार आहेत.
केरळ, तामिळनाडूनंतर राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा कर्नाटकात आहे. गुरुवारी या यात्रेचा कर्नाटकातील चौदावा दिवस. एकवीस दिवसात 511 किलोमीटर अंतर कापण्याचे नियोजन आहे. सध्या तरी कर्नाटकात भारत जोडो यात्रेला उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. म्हणूनच भाजपने घाईगडबडीने जनसंकल्प यात्रा सुरू केली. विधानसभा निवडणुकीला सहा महिन्यांहून अधिक काळ शिल्लक आहे. आतापासूनच राजकीय पक्षांचे नेते मैदानात उतरले आहेत. वेगवेगळय़ा मेळाक्यांच्या माध्यमातून एकमेकांवर चिखलफेक करण्याचे प्रकारही सुरू आहेत. बोलण्याच्या ओघात राहुल गांधी यांचा उल्लेख येडियुराप्पा यांनी सामान्य बच्चा असा केला. माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी याविषयी नाराजी व्यक्त केली आहे. येडियुराप्पा इतक्मया खालच्या पातळीला उतरतील, असे आम्हाला वाटले नव्हते. राहुलना बच्चा म्हणता नरेंद्र मोदी काय मोठे विश्वगुरू लागून गेले आहेत काय? असा प्रतिहल्ला सिद्धरामय्यांनी केला आहे. ते घाबरट आहेत. धाडस असेल तर एक पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे द्यायला सांगा, असे ट्विट सिद्धरामय्यांनी केले आहे.
भाजपच्या जनसंकल्प यात्रेसाठी मुख्यमंत्री बसवराज बोम्माई व येडियुराप्पा हे दोन्ही नेते बाहेर पडले आहेत. यात्रेला एकटे जाण्यासाठी मुख्यमंत्र्यांना धाडस नाही, असे सिद्धरामय्या यांनी ट्विट केले आहे. त्यामुळे ज्यांनी देशाची फाळणी केली त्यांच्याकडून शिकण्यासारखे काही नाही, असे मुख्यमंत्र्यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. याबरोबरच आणखी एक मुद्दा ठळक चर्चेत आला आहे. गेल्या आठवडय़ात मंत्रिमंडळाने अनुसूचित जाती-जमातींना आरक्षणवाढीचा लाभ मिळवून दिला आहे. या मुद्दय़ावरही काँग्रेस आणि भाजप नेत्यांमध्ये चांगलीच जुंपली आहे तुम्हाला दलितांची मते हवी आहेत. आजवर त्यांच्या मतांवरच राजकारण केलेत. पण आरक्षणात वाढ केली नाही. वीरशैव, लिंगायत अशी फारकत करून धर्म फोडण्याचा प्रयत्न केला, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. भाजपला निवडणुका जवळ आल्या की दलितांची आठवण येते. यापुढे दलितांच्या घरी भाजप नेत्यांच्या येरझाऱया वाढणार आहेत. जाती-धर्मात फूट पाडून भाजप समाजामध्ये दुही पाडण्याचे काम करतो. अशा शब्दात सिद्धरामय्यांनी भाजपचा खरपूस समाचार घेतला आहे.
निवडणुका जवळ येतील तसे हे आरोप-प्रत्यारोप, कलगीतुरा वाढणार आहे. आरक्षण वाढीचा निर्णय घेणाऱया भाजप सरकारसमोर आणखी एक संकट उभे ठाकले आहे. पंचमसाली समाजाच्यावतीने आरक्षणासाठी गेल्या अनेक वर्षांपासून आंदोलन सुरू आहे. पंचमसाली समाजाचा 2-ए मध्ये समावेश व्हावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आरक्षणवाढीसाठी झालेल्या बैठकीत यासंबंधीचा विचारही झालेला नाही. मुख्यमंत्र्यांनी लवकरात लवकर सर्वपक्षीयांची बैठक बोलावून आरक्षणासंदर्भात आपली स्पष्ट भूमिका जाहीर करावी, अशी मागणी पंचमसाली गुरुपीठाचे श्री बसव जयमृत्युंजय स्वामीजींनी केली आहे. यापाठोपाठ बेडजंगम, वक्कलिग आदी समाजांकडूनही आरक्षणासाठी मागणी केली जात आहे. त्यामुळे आरक्षणाचा मुद्दा सरकारला डोकेदुखीचा ठरणार आहे. पंचमसाली समाजाने सध्या ताठर भूमिका घेतली आहे. मुख्यमंत्र्यांनी लवकरात लवकर निर्णय घेतला नाही तर विधानसौधला धडक देण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहे. अखेर हावेरीमध्ये होऊ घातलेले अखिल भारतीय कन्नड साहित्य संमेलन पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संमेलन केवळ एक महिन्यावर येऊन ठेपले असताना कोणतीच पूर्वतयारी झालेली नाही म्हणून साहित्य परिषदेच्या अध्यक्षांनी नाराजी व्यक्त केली होती. 11 नोव्हेंबरपासून तीन दिवस हे संमेलन होणार होते. आता 6 जानेवारी 2023 पासून तीन दिवस संमेलनासाठी तारीख ठरविण्यात आली आहे. कन्नड व संस्कृती खात्याचे मंत्री व्ही. सुनीलकुमार यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून संमेलनाची तारीख ठरविल्याचे जाहीर केले आहे. सरकारी अनुदानावर विसंबून न राहता लोकवर्गणीतून संमेलन भरविण्याचा विचार पुढे आला आहे. प्रत्येक संमेलनाच्यावेळी अशा विचारांवर चर्चा घडते. शेवटी त्यातून कोणताच निर्णय होत नाही. आताही तसेच सुरू आहे. जानेवारीत होणाऱया संमेलनासाठी आतापासूनच तयारी करण्यात येणार असल्याचे सरकारने जाहीर केले आहे.