भयभीत झालेल्या ग्रामस्थांना मिळाला दिलासा, विविध उपाययोजनांनी फैलाव रोखण्यात यश
प्रतिनिधी / सरवडे
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत राधानगरी तालुक्यातील कासारपुतळे गावात रोगाचा फैलाव मोठ्या प्रमाणात सुरू झाला . छोट्याशा या गावात तब्बल बारा जणांना कोरोनाची लागण झाली त्यामध्ये तीन जणांना प्राण गमवावा लागला. त्यामुळे गावकरी भयभीत झाले होते मात्र ग्रामपंचायत, दक्षता समिती व ग्रामस्थांच्या एकीने विविध उपाययोजना व खबरदारी घेऊन या गावाने कोरोनावर मात केली असून सध्या हे गाव कोरोनामुक्त झाले आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जिल्ह्यात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत गेली. या दुसऱ्या लाटेत कासारपुतळे गावातही अनेकांना कोरोनाची लागण झाली. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनी विविध ठिकाणी उपचार सुरू ठेवले मात्र त्यामध्ये तिघांचा मृत्यू झाला. गावात वाढणारी रुग्णांची संख्या आणि होणारे मृत्यू यामुळे संपूर्ण गाव भयभीत झाले होते. गावातील सरपंच आक्काताई सिताराम खाडे, उपसरपंच डी. डी. पाटील, सर्व सदस्य, ग्रामसेवक संजय शेणवी, कर्मचारी, दक्षता समिती, स्थानिक डॉक्टर, गावातील पदाधिकारी, ज्येष्ठ व्यक्ती, व्यापारी व आरोग्य विभाग यांच्या संगनमताने गावात कडक नियमांची अंमलबजावणी करण्यात आली.
रोगाच्या खबरदारीबरोबर प्रतिबंधक उपाय योजना आखण्यात आल्या. ग्रामस्थांनी त्याला सहकार्य केले. त्यामुळे कोरोनाचा प्रभाव कमी होत गेला. गावात रुग्णांची संख्या वाढू लागल्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाचा स्वॅब तपासण्यात आला. गावातील सर्व दुकाने बंद ठेवून गावभर औषध फवारणी करण्यात आली. रुग्ण असलेल्या गल्ल्या सील करण्यात आल्या. सकाळ संध्याकाळी कोणीही बाहेर फिरू नये व जमू नये यासाठी दवंडी सुरु केली. तर घरोघरी सर्व्हे करून सर्दी, ताप असणाऱ्यांवर उपचार करण्यात आले. ग्रामपंचायत व आरोग्य विभाग यांनी विशेष लक्ष ठेवून उपाय योजना आखल्याने त्याचा परिणाम सकारात्मक झाल्याने गावाची वाटचाल कोरोनामुक्ती कडे झाली.
या गावात रुग्णांची संख्या वाढू लागल्याने गावातील लोक बाहेर जात नव्हते तर बाहेरील लोक गावात येताना विचार करत होते. आज या गावाने सर्वांच्या विचाराने व एकीने विविध उपाययोजना करून कोरोनावर मात केली असून भविष्यात अशाच उपायोजना कायम राखल्या तर कोरोनाला रोखणे शक्य होणार आहे.