पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांचा कोरोना संदेश
शब्दांकन : संजीव खाडे, कोल्हापूर
कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक असणारे डॉ. अभिनव देशमुख (मूळ गाव पोहनेर, जि. उस्मानाबाद) हे अष्टपैलू व्यक्तीमत्व. एमबीबीएसच पदवी संपादन केल्यानंतर पेंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन ते गुजरातमध्ये केंद्रीय सीमाशुल्क विभागात सहाय्यक आयुक्त म्हणून रूजू झाले. दोनवर्षे सेवा केल्यानंतर ते आयपीएस अर्थात भारतीय पोलीस सेवा परीक्षा उत्तीर्ण झाले. गडचिरोली जिल्हय़ात त्यांनी नक्षलवाद मोडून काढण्याचा पराक्रम केला. ग्रामीण नक्षलवाद, माओवाद मोडून काढताना गडचिरोली पोलिस प्रशासनाने राबविलेले सोशल पोलिसिंगची दखल राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतली गेली. एकेकाळी माओवाद्यांनी पुरस्कृत केलेला नक्षलवाद मोडून काढणारे डॉ. अभिनव देशमुख सध्या कोल्हापूर जिल्हय़ात कोराना विरूद्धच्या लढाईत कोल्हापूरकरांच्या साथीने लढत आहेत. त्यांचे सर्व सहकारी गेली चार महिने रस्त्यावर अहोरात्र राबत आहेत. एकेकाळी माओवाद्यांचा कर्दनकाळ ठरलेल्या डॉ. अभिनव देशमुख यांच्या पत्नी सौ. सोनाली देखील डॉक्टर आहेत. त्या देखील कोरोनाविरूद्धच्या लढय़ात सक्रिय आहेत.
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी संदेश देताना आपल्या भावना तळमळीने मांडल्या आहे. डॉ. देशमुख म्हणातात, कोरोनाची लढाई ही काही एकटय़ा प्रशासनाची नाही, ही सर्वांची जबाबदारी आहे. सर्व समाजघटकांचा त्यामध्ये सक्रिय सहभाग असल्या शिवाय आपण यशस्वी होवू शकणार नाही. कोल्हापूरकर नेहमीच कोणत्याही संकटात उत्स्फुर्तपणे धावुन येतात. याही वेळी ते कोरोनाच्या संकटाचा एकजुटीने सामना करत आहेत. आठवडय़ाचा लॉकडाऊन आपण सर्वांनी काटेकोरपणे पाळलाच पाहिजे, पण त्यात महत्वाची गोष्ट आहे ती या लॉकडाऊनच्या काळात पुढील काळातील कोवीड विरूद्धच्या लढाईसाठीची पुर्वतयारी आपण सर्वांनी केली पाहिजे. आपले मुख्य लक्ष्य कोवीडमुळे होणारे मृत्यु रोखणे हे आहे. त्यासाठी पाच गोष्टी, पंचसूत्रीचा वापर केला पाहिजे. कोविडविरोधातील लढय़ात जिल्हा पोलीस प्रशासन सर्वांसाठी कार्यरत आहे. त्यांना सहकार्य करा. अत्यावश्यक, वैद्यकीय कामाव्यतिरिक्त घराबाहेर पडू नका. स्वतःबरोबर आपला परिवार, समाजाचे जीवनच अत्यावश्यक आहे, हे विसरू नका.
कॉन्टॅक्ट टेसिंगची संकल्पना
कोरोना पॉझिटिव्हचा अहवाल आल्यानंतर रूग्णाच्या संपर्कात आलेल्यांचा शोध यंत्रणेला घ्यावा लागतो. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून प्रत्येकाने गेल्या दहा दिवसांत आपल्या संपर्कात आलेल्यांची नावे डायरीत नोंद करावीत. त्यामुळे कॉन्टॅक्ट टेसिंगचे काम काम सुलभ होऊन संभाव्य धोका कमी करण्यास मदत होईल.
डॉ. देशमुखांची पंचसुत्री
1) आपल्यामुळे आपल्या घरातील वृद्ध व व्याधीगस्तांना बाधा होणार नाही याची काळजी घेणे.
2) सर्दी, खोकला व इतर लक्षणे दिसताच तात्काळ कोवीड तपासणी करणे.
3) सतत मास्कचा वापर करणे.
4) आपली लढाई रुग्णाशी नसून रोगाशी आहे याचे भान ठेवणे.
5) सोशल डिन्स्टन्सिगचे नियम पाळणे.